Manoj Jarange : मोठी बातमी, मनोज जरांगे यांचा मराठवाडा दौरा तडकाफडकी रद्द, अशक्तपणा, ताप… आंदोलनाचे स्थळही बदलणार?
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अचानक, तडकाफडकी गोदा खोऱ्यातील दौरा रद्द केला. तब्येत ठीक नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वीच तब्येत साथ देत नसतानाही त्यांनी अंतरवाली सराटीत मराठा अभ्यासकांची बैठक घेतली होती. त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे.

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मे महिन्याच्या अखेरीस तळपत्या उन्हात आंदोलन केले होते. त्याचा मोठा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला होता. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेत त्यांनी सरकारविरोधात पुन्हा रणशिंग फुंकले. 29 ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला. अंतरवाली सराटीतून हे आंदोलन होत असले तरी मराठे मुंबई कधी गाठतील हे सांगता येत नसल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान केले होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांनी मराठा अभ्यासकांची अंतरवाली सराटीत बैठक घेतली होती. तब्येत साथ देत नसतानाही त्यांनी बैठक घेतली. तर मराठवाड्याचा दौरा त्यांनी याच कारणामुळे रद्द केल्याचे समोर आले आहे.
जरांगेंची तब्येत पुन्हा बिघडली
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली. त्यांच्यावर अंतरवाली सराटीत उपचार सुरू करण्यात आले होते. अशक्तपणा आणि ताप आल्याने सलाईनद्वारे उपचार करण्यात आले. बैठकीसाठी त्यांनी कालच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला होता. तर तब्येत ठीक नसल्यामुळे प्रस्तावित मराठवाडा दौरा देखील मनोज जरांगे यांनी रद्द केला आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दौऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर मधील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र काल त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला होता. आज पुन्हा एकदा त्यांना अशक्तपणा आणि ताप आल्याने त्यांच्यावरती अंतरवाली सराटी येथील सरपंचांच्या घरी सलाईनद्वारे उपचार करण्यात येत आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा रद्द
मनोज जरांगे पाटील यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर 20 तारखेपासून मराठवाडा दौरा होणार होता. या दौऱ्याची आखणी देखील करण्यात आली होती मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने मराठवाड्याचा दौरा रद्द करण्यात आला आहे. 29 ऑगस्ट च्या आंदोलनापूर्वी अंतरवाली सराटीत गोदापट्ट्यातील गावांची बैठक होणार आहे. यानंतर 29 ऑगस्ट च्या आंदोलनाला सुरुवात होईल. हे आंदोलन आंतरवाली सराटीत होणार की मुंबईत हे अजून स्पष्ट नाही दरम्यान आझाद मैदान पोलिसांकडे आंदोलनासाठीच्या परवानगी करिता अर्ज देण्यात आलेला आहे.
मुंबईत मराठा विरुद्ध ओबीसी सामना?
पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यादरम्यान मराठे आंतरवाली सराटीत आंदोलनाची हाक देतील. पण ते मुंबईत केव्हा येतील हे सांगता येत नाही असा दावा जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी वर्षा बंगला खुणावत असल्याचे म्हटले होते. गेल्या दोन महिन्यांपासून जरांगे पाटील सरकारवर सातत्याने तोफ डागत आहे. अशात त्यांच्या शब्दांना मोठी धार आली आहे. त्यांनी मुंबईत गनिमी काव्यासारखे आंदोलन करण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. तर दुसरीकडे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी सुद्धा मुंबईत ओबीसी आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली आहे. यामुळे मुंबईत मराठा विरुद्ध ओबीसी असा सामना रंगण्याची चिन्हं आहे. तर राज्यात मुद्दाम मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सरकार घडवून आणत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
