राज्यात घडामोडींना वेग! मध्यरात्री शिंदे यांच्यानंतर मुनगंटीवारही मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी, नेमकं कारण काय?
एकनाथ शिंदे यांच्यासहित सुधीर मुनगंटीवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर आलं आहे. त्यांनी चंद्रपूरच्या प्रश्नाविषयी चर्चा केल्याचे समोर आलं आहे.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील दोन दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मध्यरात्री एकनाथ शिंदे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षानिवासस्थानी भेट घेतली. सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीचे कारण समोर आलं आहे. त्यांनी चंद्रपुरातील विविध विषयांसदर्भात चर्चा केल्याचे समोर आलं आहे.
राज्यात राजकीय नेत्यांचा भेटींचा धडाका सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न पंतप्रधान मोदींकडे मांडले होते. दिल्लीनंतर आता राज्यातही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता आणखी एक बडा नेता मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे समोर आलं आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली.
सुधीर मुनगंटीवार यांची पोस्ट जशीच्या तशी
या भेटीवर सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, ‘ चंद्रपुरातील विविध विषयांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध प्रश्नांसह प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील विमा हप्त्याच्या दरातील तफावतीचा मुद्दा मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिला’.
‘यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निश्चित करण्यात आलेला पीकविमा हप्ता इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे पीकविम्याचे दर समतोल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २४ तास कृषी वीजपुरवठा, पीकविमा योजनेचा लाभ, नोंदणीसाठी आवश्यक मुदतवाढ, तसेच मूल येथील अत्याधुनिक स्वर्गीय बाबुराव शेडमाके क्रीडा संकुलासाठी ₹१३७ कोटींच्या प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया गतिमान करण्याबाबतही चर्चा केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व विषयांवर सकारात्मकता दर्शवत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.