Shivsena Hearing : ‘आम्हाला ते तपासावं लागणार’, शिवसेना वादावरच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाची सर्वोच्च टिप्पणी; शिंदेंना धक्का?
सर्वोच्च न्यायालयात नीरज कौल शिंदे गटाची बाजू मांडत होते. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाने योग्यच भूमिका घेतली. पक्ष कोणाचा हे ठरण्यासाठी एकूण तीन चाचण्या आहेत. यातील पहिली चाचणी ही संघटना, दुसरी टेस्ट ही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे अॅफिडेव्हिट, तिसरी टेस्ट ही विधीमंडळ पक्ष आहे, असे कौल यांनी याआधीच्या सुनावणीत सांगितले होते.

Shiv Sena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष नेमका कुणाचा तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कोणाचे यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे यांच्यातर्फे कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केलेला आहे. सध्या शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू आहे. शिंदे यांच्यातर्फे नीरज कौल हे बाजू मांडत आहेत. आपल्या युक्तिवादादरम्यान पक्ष कोणाचा हे ठरवण्यासाठी विधिमंडळातील संख्याबळ किती महत्त्वाचे आहे, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतच निवडणूक आयोगाची भूमिका ही योग्य आहे, असेही ते आपल्या युक्तिवादात म्हणत आहेत. दरम्यान, कौल यांचा युक्तिवाद सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. या टिप्पणीमुळे निर्णय नेमका कोणाच्या बाजूने लागणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. सर्वोच्च न्यायालायने निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयीही महत्त्वाचे विधान केले आहे.
आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?
सर्वोच्च न्यायालयात नीरज कौल शिंदे गटाची बाजू मांडत होते. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाने योग्यच भूमिका घेतली. पक्ष कोणाचा हे ठरण्यासाठी एकूण तीन चाचण्या आहेत. यातील पहिली चाचणी ही संघटना, दुसरी टेस्ट ही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे अॅफिडेव्हिट, तिसरी टेस्ट ही विधीमंडळ पक्ष आहे, असे कौल यांनी याआधीच्या सुनावणीत सांगितले होते. तर आजच्या सुनावणीत कौल यांनी अगोदरच्या दोन चाचण्यांबाबत निवडणूक आयोगाला संदिग्ध वाटल्या असाव्यात. त्यामुळेच तिसऱ्या चाचणीचा गांभीर्याने विचार करण्यात आला, असे कौल आपल्या युक्तिवादात म्हणाले.
विधीमंडळ चाचणी महत्वाची वाटते का?
त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी महत्त्वाची टिप्पणी केली. दहावे शेड्युलच लागू होईल की नाही अशी परिस्थिती असेल तेव्हा विधीमंडळ चाचणी महत्वाची वाटते का? प्रश्न हा आहे की निवडणूक आयोगाने संबंधित बाबीचा विचार केला का आणि त्याच्या परिणामाचा शोध घेतला का? या एका कारणामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा ठरेल असे आम्ही म्हणत नाही, परंतु न्यायिक पुनर्विलोकनाच्या दृष्टिकोनातून वाजवी विचाराचा अर्थ सर्व पर्यायांचा विचार केला गेला आहे का, असा असतो, असे न्यायालय म्हणाले.
निवडणूक आयोगाचा निकाल सर्वोच्च न्यायालय फिरवणार का?
तसेच, आम्ही निवडणूक आयोगाच्या विवेकाधिकाराची जागा घेऊ शकत नाही. पण विवेकाधिकाराचा वापर कसा केला जातो आणि संबंधित संभाव्य परिणामाचा शोध घेतला जातो की नाही हे आम्हाला तपासावे लागेल, अशी मोठी टिप्पणीही सर्वोच्च न्यायालयाने केली. त्यामुळे आता कोर्टाच्या या टिप्पणीमुळे निवडणूक आयोगाचा निकाल सर्वोच्च न्यायालय फिरवणार का? निकाल नेमका काय लागणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.