प्रेमाचा संशय, विश्वासघात अन् हत्या; मृतदेहासोबत 191 किलोमीटर प्रवास, पोलिसाचा कारनामा वाचून थक्क व्हाल!

Crime News : कळंबोलीत हत्या करून मृतदेह तब्बल 191 किलोमीटर अंतरावर नेऊन विहिरीत टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रेमाचा संशय, विश्वासघात अन् हत्या; मृतदेहासोबत 191 किलोमीटर प्रवास, पोलिसाचा कारनामा वाचून थक्क व्हाल!
Crime
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 13, 2026 | 11:23 PM

संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. मैत्री, त्यातून निर्माण झालेला संशय आणि त्या संशयातून घडलेली अमानुष हत्या. साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील शेतविहिरीत सापडलेल्या मृतदेहामागची कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे. कळंबोलीत हत्या करून मृतदेह तब्बल 191 किलोमीटर अंतरावर नेऊन विहिरीत टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नवी मुंबई पोलिस दलातील कार्यरत हवालदार असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

विहिरीत आढळला होता मृतदेह

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, 6 फेब्रुवारी रोजी लोणंद पोलिस ठाणे हद्दीतील सुखेड गावात एका शेतविहिरीत जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृताची ओळख पुसण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा दाखल करून लोणंद पोलिसांनी तपास सुरू केला आणि अवघ्या तीन दिवसांत हा भीषण कट उघडकीस आणला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस पुण्यातील एका संशयित कारपर्यंत पोहोचले. या धाग्यावरून संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला.

संशयातून हत्या

बंडू भिसे, रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला हवालदार, यानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले. सुटीवर असलेला बंडू कळंबोलीतील रोडपाली परिसरात राहत होता. याच परिसरातील सोमनाथ बोबडे याच्याशी त्याची मैत्री होती. मात्र, सोमनाथचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय बंडूच्या मनात घर करून बसला होता. याच संशयातून त्याने सूड उगवण्याचा कट रचला.

पुरावे लपण्याचा प्रयत्न

5 फेब्रुवारी रोजी बंडूने पुण्यातून विजय पवार, किरण गायकवाड आणि श्रीनिवास लोणे यांना बोलावून घेतले. सोमनाथला भेटीसाठी बोलावून विश्वासाने आलेल्या सोमनाथचा तोंड दाबून निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह कारच्या पुढील सीटवर ठेवून बंडूने स्वतः 191 किलोमीटरचा मृत्यूचा प्रवास केला. सुखेड गावात पोहोचल्यानंतर विहिरीच्या काठावर मृतदेह जाळण्यात आला आणि नंतर तो विहिरीत ढकलून आरोपी मुंबईत परतले. स्वतः पोलिस असल्याने कोणताही पुरावा मागे राहू नये, यासाठी त्यांनी विशेष खबरदारी घेतल्याचे तपासात उघड झाले.

आरोपींना बेड्या

अटकेनंतर बंडूने गुन्ह्याची कबुली देण्यास नकार दिला होता. मात्र, लोणंद पोलिसांनी त्याच्या साथीदारांना विश्वासात घेतल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम समोर आला. पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शिवाजी जायपात्रे आणि उपनिरीक्षक रोहित हेगडे यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.