ठाकरे – शिंदे गट ‘या’ कारणासाठी आले पुन्हा एकत्र, विरोध मावळला? शिवसेना आमदाराचे मोठे विधान

एकमेकाचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आणि आमदार अखेर एकत्र आले आहेत. ही किमया एका कार्यक्रमात घडली आहे. मात्र, त्यांना एकत्र पाहून राजकीय चर्चांना उधाण आलंय...

ठाकरे - शिंदे गट या कारणासाठी आले पुन्हा एकत्र, विरोध मावळला? शिवसेना आमदाराचे मोठे विधान
CM EKNATH SHNDE AND UDDHAV THACKAREY
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Aug 10, 2023 | 9:12 PM

कल्याण | 10 ऑगस्ट 2023 : राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. उध्दव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ धरली. एकनाथ शिंदे यांनी पक्ष आणि चिन्ह यावर दावा सांगत उध्दव ठाकरे यांची कोडी केली. त्यानंतर उध्दव ठाकरे यांच्यावर टिका करण्याची एकही संधी मुख्यमंत्री शिंदे यांनी सोडली नाही. त्याचवेळी ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेत शिंदे सातत्याने शह देत होते. एकमेकांविरोधात हे शह काटशहाचे राजकारण सुरू असतानाच एक महत्वाची बातमी समोर आलीय.

उध्दव ठाकरे आणि शिंदे यांच्यामधील कटूता संपविण्याच्या दृष्टिने पदाधिकारी आणि शिवसेना आमदाराने एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे. ही घटना कल्याणमध्ये घडली. येथील एका भूमिपूजनच्या कार्यक्रमात हे दोन्ही गट एकत्र आलेत.

कल्याण येथील पारनाका भागात भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान उध्दव ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण शहर प्रमुख तसेच उद्धव ठाकरे गटाचे उपशहर संघटक, शाखा प्रमुख आणि अनेक शिवसैनिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते.

शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी राजकारणासाठी गट तट झाले त्याला कल्याण पश्चिमेत थारा नाही अशी यावर प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली.

दरम्यान, आमदार विश्वनाथ भोईर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टिका केली. लव्ह जिहाद प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टिका केलीय. मात्र, आव्हाड यांनी नको त्या विषयात नाक खुपसू नये असा सल्ला त्यांनी दिलाय. एकनाथ शिंदे लोकांच्या प्रश्नासाठी दिवसरात्र काम करत असतात. घरात बसणाऱ्यांनी, टिव्ट करणाऱ्यांनी, पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी त्यावर बोलू नये असा टोलाही त्यांनी लगावला.

लव्ह जिहाद सारख्या गंभीर प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे गप्प बसणारे नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते महाराष्ट्रात फिरत असतात. छोटे प्रश्न निकाली काढण्यासाठी ते धडपडत असतात. त्यामुळे त्यांच्यावर टिका करताना जरा जपून असा इशाराही त्यांनी दिला.