मध्यरात्री ऑपरेशन टायगर, ठाकरेंना जय महाराष्ट्र करणाऱ्या नेत्या कोण? मातोश्रीचं टेन्शन वाढणार?
गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गटातून शिंदे गटात पक्षप्रवेशाचे सत्र सुरू आहे. ६ खासदार आणि सचिन अहिर यांच्यानंतर आता उपनेत्या शुभांगी पाटील यांनीही शिंदेंच्या गटात प्रवेश केला. कार्यकर्त्यांना वेळ न दिल्याने पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे ठाकरे गटाला मोठा हादरा बसला असून, शिंदे गट अधिक मजबूत झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा महत्त्वाचा बदल आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील आऊटगोईंग वाढलं असून महिन्याभरात उद्धव ठाकरेंना मोठे धक्के बसले आहेत. आधी सहा खासदारांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ते डायरेक्ट शिसवेना शिंदे गटात गेले. पक्षाला पडलेल्या मोठ्या भगदाडामुळे जो धक्का बसला त्याचे हादरे थांबतात न थांबतात तोच, उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे, आदित्य ठाकरेंचं निकटवर्तीय असलेले, वरळीत मोठा दबदबा असलेले सचिन अहिर यांनीही शिंदेंच्या गटात एंट्री केली. गेल्या महिन्याभरात घडलेल्या या घटनांमुळे ठाकरे गटात प्रचंड खळबळ उडाली. पण ठाकरे गटाला लागलेल्या गळतीचे सत्र अद्यापही सुरूच असून जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच पुन्हा एका मोठ्या नेत्याने पक्षाला जय महाराष्ट्र केला.
उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनीही काल रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मध्यरात्री 1.15 च्या सुमारास पार पडलेल्या या सोहळ्यात एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते, मात्र श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री भरत गोगावले हे यावेळी आवर्जून उपस्थित होते. पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून शिवसेनेची ताकत वाढेल . मंत्री आमदार खासदार ही सर्व ताकत शिंदे साहेबांनी शुभांगी ताई यांच्या मागे उभी केली आहे. आता बघा पुढे काय काय होतं ते, असा सूचक इशारा श्रीकांत शिंदे यांनी यावेळेस दिला. सततच्या आऊटगोईंगमुळे ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.
वेळ दिला जात नाही, पाटील यांनी व्यक्त केली होती नाराजी
तर काम फ़ास्ट होण्यासाठी आम्हाला प्रवेश करणे गरजेचे होतं असं शुभांगी पाटील म्हणाल्या. मी जाण्याचा निर्णय घेतला, सगळ्यांशी बोलणं चाललं होतं, पण थांबा असं कोणीही म्हटलं नाही, अडचण काय आहे असं कोणी विचारलंही नाही. सगळ्यांच्या मनात खदखद आहे, कार्यकर्त्यांना वेळ दिला जात नाही . मातोश्रीवर जायचं असतं पण वेळ मिळत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. शुभांगी पाटील यांच्या रुपाने शिंदे गटाला भरभक्कम मोहरा मिळाला असून ठाकरे गटाती ताकद मात्र कमी झाली आहे.
कोण आहेत शुभांगी पाटील ?
शुभांगी पाटील या पेशाने शिक्षिका आहेत. त्या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या होत्या. त्यांनी बीए, डीएड, एम.ए.बीएड आणि एल एल बी मध्ये शिक्षण पूर्ण केलं आहे. धुळ्यातील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून कामाचा त्यांना अनुभव आहे. एवढंच नव्हे तर पाटील या शिवाय त्या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापक आहेत.
महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या प्रमुख सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं. तसेच नंदूरबारच्या मोलगी येथील ग्रामविकास मंडळाच्या सचिवपदावरही त्यांनी काम केलं. जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्था आणि धुळ्याच्या युनिव्हर्सल ए इच्ज्युकेशन सोसायटीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं.
गेल्या 10-12 वर्षांपासून शुभांगी पाटील या शिक्षकांसाठी काम करत आहेत. शिक्षकांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेत त्या संबंधित विषयांचा पाठपुरावा करून त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शिक्षकांच्या मागण्यांसाठी त्यांनी आझाद मैदानावर उपोषणही केले होते.
राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी ‘महाराष्ट्र टिचर्स असोसिएशन’ची स्थापना करून शिक्षकांच्या प्रश्नांवर स्वतंत्रपणे काम करण्यास सुरुवात केली. पुढे, सप्टेंबर 2022 रोजी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. त्यानंतर 4 फेब्रुवारी 2023 रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला होता.
मात्र आता, काल (शनिवार, 3 जुलै ) रोजी त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात एंट्री केली.