चार वर्षात कल्याण-बदलापूर आणि कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर हजारापेक्षा जास्त अपघात, शेकडो मृतदेह बेवारस

| Updated on: Dec 20, 2020 | 1:18 AM

कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याअंतर्गत कल्याण ते कसारा, कल्याण ते बदलापूर ही स्थानके येतात. 84 किलोमीटरच्या परिसरात दोन्ही मार्गांवर नेहमी अपघात (train accident) होतात.

चार वर्षात कल्याण-बदलापूर आणि कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर हजारापेक्षा जास्त अपघात, शेकडो मृतदेह बेवारस
Follow us on

ठाणे : कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याअंतर्गत कल्याण ते कसारा, कल्याण ते बदलापूर ही स्थानके येतात. 84 किलोमीटरच्या परिसरात दोन्ही मार्गांवर नेहमी अपघात (train accident) होतात. यापैकी काही लोक स्वत:हून रेल्वे पटरीवर आत्महत्या करतात. दरम्यान, रेल्वे अपघातात मृत्यू होणाऱ्यांची ओळख पटणे अवघड असते. काही लोकांची ओळख पटते तर काही लोकांची पटत नाही.

गेल्या चार वर्षांपासून या दोन्ही मार्गावर अनेक लोक अपघातात (train accident)  मरण पावले आहेत. या दोन्ही मार्गांवर गेल्या चार वर्षात 1263 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 356 मृत व्यक्तींची ओळख अद्यापही पटलेली नाही. त्यामुळे त्यांची नोंद आजही बेवारस अशीच आहे. या 356 मृत व्यक्तींमध्ये 311 पुरुष तर 45 महिला आहेत.

पोलीस एखादा मृतदेह जास्तीत जास्त दहा दिवस शवागरात ठेऊ शकतात. त्यानंतर त्या मृतदेहावर अंत्यविधी करण्याशिवाय पर्याय राहत नाही. 2017 साली रेल्वे पोलीस ठाण्यात 368 आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात 128 बेवारस आहेत. 2018 साली 390 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 107 लोक बेवारस आहेत. 2019 मध्ये 331 अपघात झाले. त्यापैकी 83 बेवासर आहेत. 2020 साली 174 अपघात झाले. त्यात 38 बेवारस आहेत.

एखाद्या अपघातानंतर पोलिसांचा प्रयत्न असतो, त्या मृतदेहाचा वारस मिळाला पाहिजे. यासाठी पोलीस भरपूर प्रयत्न करतात. मात्र अद्यापही 356 जणांचे नाव, पत्ता मिळालेला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा तपास योग्य पद्धतीने केला नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. मयतांचे नातेवाईक बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेत नाही का? असाही एक सवाल आहे.

दरम्यान, “आमच्याकडून बेवारस मृतदेहांचे वारसांचा शोध सुरु आहे.  जे लोक मिसिंग आहेत, अद्याप ज्यांच्या पत्ता लागलेला नाही त्यांच्या नातेवाईकांनी येऊन शहानिशा करावी”, असं आवाहन कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मीक शार्दूल यांनी केलं आहे.

हेही वाचा : नात्याला काळिमा! सावत्र आईने चिमुकल्याला गरम तव्यावर उभे करून दिले चटके