ठाणे पालिकेत पहिल्यांदाच 170 जणांच्या बदल्या; कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्यानंतर महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये

| Updated on: Oct 10, 2021 | 11:21 AM

ठाणे महानगरपालिकेच्या माजिवडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर ठाणे महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. (170 workers from Thane corporation encroachment department transferred)

ठाणे पालिकेत पहिल्यांदाच 170 जणांच्या बदल्या; कल्पिता पिंपळेंवरील हल्ल्यानंतर महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये
Thane municipal corporation
Follow us on

हिरा ढाकणे, ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या माजिवडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर ठाणे महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. महापालिकेने अतिक्रमण विभागातील 10-12 नव्हे तर एकूण 170 अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. पालिकेच्या एखाद्या विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्याची ठाणे महापालिकेतील ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे राज्यातील महापालिकांच्या इतिहासातीलही ही पहिलीच वेळ आहे.

कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्यानंतर पालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेत या बदल्या केल्या आहेत. ठाणे महापालिकेतील अतिक्रमण विभागातल्या 170 जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकाच विभागात काम करणाऱ्या एवढ्या लोकांची बदली करण्याची एखाद्या पालिकेतील ही पहिलीच वेळ आहे. या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची इतर विभागात बदली करण्यात आली असून इतर विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची अतिक्रमण विभागात बदली करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्यांमध्ये माजिवडा विभागातली अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हे अधिकारी-कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच खात्यात काम करत होते. त्यांच्या बदल्या पेंडिंग होत्या. त्यामुळे त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शिवाय एकाच विभागात अधिकारी-कर्मचारी कायम राहिल्यास सुस्तावलेपण, भ्रष्टाचार आदी गोष्टींना वाव मिळतो. त्यामुळेही बदल्या केल्या जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 30 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. या घटनेनंतर तीव्र पडसाद उमटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली होती. तसेच फोनवरून पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीरही दिला होता.

राज ठाकरेंचा इशारा

दरम्यान, या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. तसेच या घटनेवर त्यांनी तीव्र प्रतिक्रियाही व्यक्त केली होती. “पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? तुम्ही बोटं छाटता? आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर. सरकार कशासाठी आहे? सरकारने यावर बंधनं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही. इतक्या वर्षात कुणाची हिंमत झाली नाही बोटं छाटायची. हे सहीसलामत बेलवर सुटणार. यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल.” असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.

 

संबंधित बातम्या:

आम्हाला सशस्त्र पोलीस बंदोबस्त द्या, केडीएमसी अधिकाऱ्यांची मागणी, ठाण्यातील घटनेच्या विरोधात कामबंद आंदोलन

राज ठाकरेंची पुन्हा परप्रांतीयविरोधी भूमिका? राज म्हणतात, बोटं छाटणारा बाहेर येऊ दे!

मोठी घटना ! ठाण्यात सहाय्यक पालिका आयुक्तांवर फेरीवाल्याचा हल्ला, दोन बोटे तुटली, फेरीवाल्यांची गुंडगिरी पुन्हा चव्हाट्यावर

(170 workers from Thane corporation encroachment department transferred)