अंबरनाथमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य, सर्वपित्रीच्या दिवशी घालणार पालिकेचं श्राद्ध; प्रशासनाची ‘शांती’ करण्यासाठी भाजपचं आमंत्रण

| Updated on: Oct 06, 2021 | 10:19 AM

अंबरनाथ शहरात काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या समस्येकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्यानं भाजपकडून या खड्ड्यांमध्येच सर्वपित्रीच्या दिवशी पालिकेचं श्राद्ध घातलं जाणार आहे. (bjp will protest against ambernath corporation over pothole)

अंबरनाथमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य, सर्वपित्रीच्या दिवशी घालणार पालिकेचं श्राद्ध; प्रशासनाची शांती करण्यासाठी भाजपचं आमंत्रण
सांकेतिक फोटो
Follow us on

अंबरनाथ: अंबरनाथ शहरात काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या समस्येकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्यानं भाजपकडून या खड्ड्यांमध्येच सर्वपित्रीच्या दिवशी पालिकेचं श्राद्ध घातलं जाणार आहे. त्यासाठी भाजपनं थेट पालिका अधिकाऱ्यांनाच आमंत्रण दिलं आहे.

अंबरनाथ शहरात सध्या बहुतांशी रस्ते सिमेंट काँक्रीटचे झालेले असले तरी काही रस्ते अजूनही डांबराचे आहेत. त्यांची अवस्था सध्या बिकट आहे. अंबरनाथ शहराकडून लोकनगरीमार्गे एमआयडीसीकडे जाणारा मुख्य रस्ता, लक्ष्मीनगरकडून गॅस गोडाऊनमार्गे नवरे नगरकडे जाणारा रस्ता या रस्त्यांची सध्या खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झाली आहे. याकडे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्यानं अखेर भाजपनं आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. भाजपचे शहराध्यक्ष अभिजित करंजुले हे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी गॅस गोडाऊन भागातील खड्ड्यांमध्ये पालिका प्रशासनाचं श्राद्ध घालणार आहेत. भाजप नेत्यांनी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांची भेट घेतली. तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही तुमची शांती करण्यासाठी या, असं निमंत्रण दिलं. पालिका लक्ष देत नसल्यानं आमच्यावर ही वेळ आली असून यानंतर तरी खड्डे बुजतील, अशी अपेक्षा यानंतर भाजप शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांनी व्यक्त केली.

पाऊस थांबल्यावर डांबरीकरण

तर पालिकेनं खड्डे पडलेल्या या दोन्ही रस्त्यांचं पाऊस थांबला डांबरीकरण करण्याचं आश्वासन दिलं आहे. भविष्यात या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे. अंबरनाथ शहरातले 80 टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले असून आता पालिकेला फक्त उर्वरित 20 टक्के डांबरी रस्त्यांची पावसाळ्यात काळजी घ्यायची असते. मात्र तरीही इथे खड्डे पडत असल्यानं पालिकेचे इंजीनिअर नेमकं करतात तरी काय? आणि वार्षिक दरानुसार मंजूर असलेले खड्डेभरणीचे पैसे जातात कुठे? असा प्रश्न यानंतर विचारला जात आहे.

ठाण्यात चार अभियंते निलंबित

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या खड्ड्यांचा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही बसला आहे. त्याची दखल खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. शिंदे यांनी ठाण्यातील खड्डयांची पाहणी करून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर या खड्ड्यांना जबाबदार असलेल्या पालिकेच्या चार अभियंतांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेने आज ही कारवाई केली. उथळसर प्रभाग समितीतील अभियंता चेतन पटेल, वर्तकनगर प्रभाग समितीतील अभियंता प्रशांत खडतरे, लोकमान्य नगर-वर्तक नगर प्रभाग समितीतील अभियंता संदीप सावंत आणि संदीप गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डे कालमर्यादेत बुजविण्यात या अभियंत्यांना अपयश आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, पालिकेने अभियंत्यांवर कारवाई केली. मात्र, कंत्राटदारांवर कारवाई कधी करणार असा सवाल या निमित्ताने केली जात आहे.

 

संबंधित बातम्या:

उल्हासनगरात वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह, परिसरात खळबळ, हत्या की आत्महत्या, गूढ कसं उलगडणार?

VIDEO : भर दिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत पळ, सीसीटीव्हीत घटना जशीच्या तशी

बलात्कार पीडिता आणि तिच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी नीलम गोऱ्हे डोंबिवलीत, पोलिसांनाही महत्त्वपूर्ण सूचना

(bjp will protest against ambernath corporation over pothole)