उल्हासनगरात भाजपचा सिंह आला पण गड गेला, स्थायी समितीचं सभापतीपद जिंकलं, पण……….

| Updated on: Jun 16, 2021 | 9:59 PM

उल्हासनगर महापालिकेत भाजपची सिंह आला पण गडच गेला, अशी अवस्था झाली (BJP won Ulhasnagar Municipal Corporation standing committee speaker election but lost four ward committees election).

उल्हासनगरात भाजपचा सिंह आला पण गड गेला, स्थायी समितीचं सभापतीपद जिंकलं, पण..........
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

उल्हासनगर (ठाणे) : उल्हासनगर महापालिकेत भाजपची सिंह आला पण गडच गेला, अशी अवस्था झाली आहे. कारण आज (16 जून) झालेल्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला असला, तरी चारही प्रभाग समित्या मात्र महाविकास आघाडीच्या ताब्यात गेल्या आहेत. टीम ओमी कलानी आणि साई पक्ष या दोन सहकाऱ्यांनी साथ सोडल्यानं भाजपवर ही वेळ आली आहे (BJP won Ulhasnagar Municipal Corporation standing committee speaker election but lost four ward committees election).

भाजपचे टोनी सिरवानी यांची बिनविरोध निवड

उल्हासनगर महापालिकेच्या बहुप्रतिक्षित अशा स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक आज पार पडली. 16 सदस्यांच्या स्थायी समितीत भाजपचे 8 आणि रिपाईचा 1 असे 9 सदस्य भाजपच्या बाजूने होते. तर शिवसेनेचे 5, राष्ट्रवादी आणि साई पक्षाचा प्रत्येकी 1 सदस्य असे 7 सदस्य महाविकास आघाडीच्या बाजूने होते. त्यामुळे भाजपचाच उमेदवार जिंकणार, हे स्पष्ट असल्यानं शिवसेनेनं या निवडणुकीतून माघार घेतली, आणि भाजपचे टोनी सिरवानी हे स्थायी समितीचे सभापती म्हणून बिनविरोध निवडून आले (BJP won Ulhasnagar Municipal Corporation standing committee speaker election but lost four ward committees election).

चार प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव

यानंतर झालेल्या चार प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत मात्र भाजपचे साथीदार असलेले साई आणि टीम ओमी कलानी हे पक्ष महाविकास आघाडीत सामील झाले. त्यामुळे प्रभाग समिती क्रमांक 1, 2 आणि 3 वर महाविकास आघाडीचे अनुक्रमे हरेश जग्यासी, छाया चक्रवर्ती आणि दीप्ती दुधानी हे उमेदवार निवडून आले. भाजपच्या मीना कौर लबाना, महेश सुखरामानी आणि रवी जग्यासी या मातब्बरांचा पराभव झाला. तर प्रभाग समिती चारमधून राष्ट्रवादीच्या बंडखोर सुमन सचदेव यांनी माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीचे विकास पाटील हे बिनविरोध निवडून आले.

भाजपची प्रतिक्रिया

दरम्यान, या निवडणुकीतनंतर महाविकास आघाडी ही लोकशाहीचे नियम पायदळी तुडवत असून घोडेबाजार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला. तर निवडून आल्यानंतर आता शहरातील धोकादायक इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट, त्यांचा पुनर्विकास, कोरोनाची तिसरी लाट हे काही प्रमुख प्रश्न आपल्यासमोर असल्याचं नवनिर्वाचित स्थायी समिती सदस्य टोनी सिरवानी यांनी सांगितलं.

शिवसेनेची प्रतिक्रिया

आमचं संख्याबळ नसल्यानं आम्ही स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. मात्र प्रभाग समिती निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानं त्यांनी आत्मपरीक्षण करावं, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.

राज्याच्या सत्तांतरामुळे स्थानिस स्वराज्य संस्थांची गणितं बदलली

आधीच उल्हासनगर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता असून शिवसेनेच्या लिलाबाई आशान या महापौर आहेत. त्यात आता साई पक्ष आणि भाजपच्या चिन्हावर निवडून आलेली टीम ओमी कलानी सुद्धा महाविकास आघाडीत सामील झाले आहेत. त्यामुळे भाजपकडे फक्त स्थायी समिती शिल्लक राहिलीय. यातूनच राज्यातल्या सत्तांतरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची गणितंही बदलल्याचं पाहायला मिळतंय.

संबंधित बातमी : उल्हासनगर महापालिका स्थायी सभापती निवडणूक, भाजपचे सिरवानी विजयी, महाविकास आघाडीला धक्का