CM Eknath Shinde: ‘दया कुछ तो गडबड है, मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी दादा आणि ताईंमध्ये स्पर्धा’, एकनाथ शिंदे गटाचा निशाणा कुणावर?

| Updated on: Sep 04, 2022 | 9:00 PM

सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या श्रद्धेचेही राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे, हे चुकीचे असल्याचे मत म्हस्के यांनी मांडले आहे. एकनाथ शिंदे यावर्षीच नव्हे तर गेली अनेक वर्ष पहाटेपर्यंत गणपतींच्या दर्शनाला घरोघरी फिरत असत. मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांचे हात आभाळाला लागलेले नाहीत. पाय जमिनीवरच आहेत.

CM Eknath Shinde: दया कुछ तो गडबड है, मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी दादा आणि ताईंमध्ये स्पर्धा, एकनाथ शिंदे गटाचा निशाणा कुणावर?
मुख्यमंत्र्यांच्या गणेश दर्शनाचे राजकारण
Follow us on

ठाणे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्यावर अनेकांच्या घरी गणेश दर्शन केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या टीका करीत आहेत. यावर अखेरीस एकनाथ शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोललो नाही तर हातचे विरोधी पक्षनेतेपद पण जाईल या भीतीने अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत, असे वक्तव्य एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske))यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर अनाठायी टीका करण्याची स्पर्धा सध्या सुप्रियाताई आणि अजितदादांमध्ये लागलेली आहे, ती पाहिली की ‘दया कुछ तो गडबड है’ हाच डायलॉग आठवतो असेही म्हस्के म्हणाले आहे. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका पाहता शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.

सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री झाल्याची बोच

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवारांचे उपमुख्यमंत्रीपदही गेले. त्यामुळे त्यांच्या मनातील अस्वस्थता आम्ही समजू शकतो. कदाचित त्यामुळेच कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला, तळागाळातून मेहनतीने वर आलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला ही सल कदाचित त्यांच्या मनाला बोचत असावी. अशी टीकाही नरेश म्हस्के यांनी केली आहे.

अजित पवारांचे मुख्यमंत्री व्हावे, हे स्वप्न होते. त्यांच्या राजकीय आयुष्यात एकदा तशी संधी त्यांच्यासाठी चालून आली होती. मात्र शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या जास्त जागा निवडून आल्या असतानाही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देऊ केले, त्यामुळे अजित पवारांच्या तोंडचा घास कायमचा हिरावला गेला, अशी टीकाही म्हस्के यांनी केली आहे. यापूर्वी त्यांनी पहाटे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन काकांनाच आव्हान देण्याचा प्रयत्नही करून पाहिला. परंतु काकांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला. याची आठवणही नरेश म्हस्के यांनी करुन दिली.

हे सुद्धा वाचा

हे तर श्रद्धेचेही राजकारण – म्हस्के

सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या श्रद्धेचेही राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे, हे चुकीचे असल्याचे मत म्हस्के यांनी मांडले आहे. एकनाथ शिंदे यावर्षीच नव्हे तर गेली अनेक वर्ष पहाटेपर्यंत गणपतींच्या दर्शनाला घरोघरी फिरत असत. मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांचे हात आभाळाला लागलेले नाहीत. पाय जमिनीवरच आहेत. हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला वारंवार दिसून येते. त्यामुळे सत्ता गेल्यामुळे आलेल्या वैफल्यातूनच अजित पवार आणि सुप्रिया सुळे असे आरोप करत असल्याचे मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.

काय केली होती टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या अनेकांच्या घरी गणेश दर्शनाच्या निमित्ताने जात आहेत, यावरुन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. आधी राजकुमार शो मॅन होते, तसे आता काहीजणं शो मॅन झाले आहेत. ते कॅमेरे घेवून फिरत आहेत, अशी टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली होती. तर मुख्यमंत्री पाहावे तेव्हा कुणाच्या ना कुणाच्या घरी असतात, ते टीव्हीवर पाहायला मिळते, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी आज केली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्नांसाठी मंत्र्यांची वेळ मागत आहे, मात्र वेळ मिळत नाहीये. कदाचित ते आरत्या आणि गणपती दर्शनात व्यग्र असतील अशी टीकाही त्यांनी केली होती.