मोठी बातमी! राज ठाकरे यांचे अतिशय जवळचे नेते, अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी

| Updated on: Mar 25, 2023 | 9:56 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित धमकी प्रकरणी ठाण्यात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.

मोठी बातमी! राज ठाकरे यांचे अतिशय जवळचे नेते, अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी
Follow us on

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सोशल मीडियावर (Social Media) एक ऑडिओ क्लिप (Audio Clip) व्हायरल होत आहे. संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अविनाश जाधव यांनी मुंब्रा येथील डोंगरावर अनधिकृत दर्ग्यांवर चौकशी करून हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ‘हम उसे जिंदा नही छोडेंगे, ये बच नही पाएंगे’, असा उल्लेख करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित ऑडिओ क्लिपसोबत एक मेसेजही व्हायरल होतोय. त्यामध्ये ‘बॉयकॉट अविनाश जाधव’ असा उल्लेख आहे.

नेमकं प्रकरण काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात ‘लाव रे तो व्हिडीओ’द्वारे मुंबईतील माहीम समुद्रातील अनधिकृत दर्ग्याचा पर्दाफाश केल्यानंतर राज्यभरात मनसे आक्रमक झालेली आहे. मुंब्रा येथील डोंगरावर अशाच प्रकारे काही अज्ञातांकडून 7 ते 8 अनधिकृत दर्गे उभारल्याची माहिती ठाणे शहर मनसेने उघडकीस आणली आहे. तसेच मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत मशीद व दर्गे 15 दिवसात हटवा. अन्यथा या ठिकाणी हनुमान मंदिर उभारू, असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. त्यानंतर आता त्यांनी जीवे मारण्याची धमकी आल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मनसेने अनधिकृत दर्ग्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारं निवेदन दिलं आहे. राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात राज्यभरात अनधिकृत मशीद, मजार आणि दर्ग्याची उभारणी होत असल्याचे म्हटले होते. या अनुषंगाने त्यांनी सांगली आणि मुंबुईच्या समुद्रात अशा पद्धतीने रातोरात अनधिकृत मशीद उभारल्या जात असल्याचे फोटो व व्हिडीओसहित पुरावे दाखवले. तसेच यावर अंकुश ठेवण्यात सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.

याच भाषणात राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केल्यानंतर ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंब्रा येथील डोंगरात वनखात्याच्या अखत्यारीतील असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. याच डोंगरावर मुंब्रा देवीचे मंदीर आहे. पारसिक डोंगराचा संपूर्ण भाग वन विभागाच्या अखत्यारित येत आहे. “या मंदिराच्या पायथ्यापासून ते मुंब्रा बायपास टोलनाक्यापर्यंत काही लोकांकडून दर्ग्याची अनधिकृतपणे बांधकामे करण्यात आली आहेत. या दर्ग्याची बांधकामे करण्यामागे वनविभागाची जागा हडप करण्याचा उद्देश प्रथमदर्शनी दिसून येत आहे”, असा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला.

या अवैध बांधकामास वनविभाग, जिल्हाधिकारी प्रशासन, वीज वितरण, ठाणे महापालिका, पाणी विभाग यांचेकडून सर्व सोईसुविधा देऊन अप्रत्यक्षपणे समर्थन दिले जात आहे का? तसेच हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि गंभीर आहे. या जागेवर अतिक्रमण करत असलेले भूमाफिया नक्की कोण आहेत? यांना पाठीशी कोण घालत आहे? या सर्व गंभीर गोष्टींची दखल घेऊन येत्या 15 दिवसांत हे अतिक्रमण हटवण्यात यावे, अन्यथा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच दर्ग्याच्या बाजुला हनुमान मंदिर उभारण्याचे काम सुरु करेल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.