‘देशासाठी मेहबूबा मुफ्तिसोबत गेलो, पण नंतर लाथ मारुन…’, देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलून गेले?

| Updated on: Jul 13, 2023 | 7:18 PM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा विरोधकांवर सडकून निशाणा साधला. भाजपचं भिवंडीत आज एकदिवसीय शिबीर आयोजित करण्यात आलेलं. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी तुफान शाब्दिक फटकेबाजी केली.

देशासाठी मेहबूबा मुफ्तिसोबत गेलो, पण नंतर लाथ मारुन..., देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलून गेले?
Follow us on

ठाणे : भाजपचं भिवंडीत आज एकदिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर सडकून टीका केली. त्यांनी भाजप पक्षाच्या राजकीय प्रवासाविषयी माहिती सांगितली. तसेच पक्ष आता पुढे कशी वाटचाल करेल, पक्षाचं महाराष्ट्रात आणि देशात पुढचं धोरण काय असेल? याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच त्यांनी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं.

“भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आधी ऊर्जामंत्री होते. त्यांनी खूप ऊर्जा स्वतः कडे ठेवली आहे, जे नेहमी सर्वांना ऊर्जा देत असतात. नव्या सरकारला एक वर्ष झालं आहे. ‘संपर्क से समर्थन’ हा आपला कार्यक्रम यशस्वी झाला आणि आपल्याला एक नवा सहकारी मिळाला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“भाजपचा प्रवास हा इतिहासात पाहिला तर हा प्रवास विरोधापासून सुरू झाला तो उपाहासापर्यंत पोहचला. ज्या पक्षाला केवळ दोन सदस्य निवडून आले म्हणून चिडवलं गेले. त्याच पक्षाने 2 पासून 300 पर्यंत मजल मारली. जनसंघ ते भाजप हा जो आपला प्रवास आहे यात अनेकवेळा अन्याय, उपाहास, विष, पचवलं आहे.हे आपण का करु शकलो? कारण आपल्या कार्यकर्त्यांमध्ये संयम होता आणि नेतृत्वावर विश्वास होता”, असं फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस मेहबूबा मुफ्ती यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले?

“देशाकरीता मेहबूबा मुफ्तिसोबत जावं लागलं. कारण तेव्हा ती आवश्यकता होती. काही लोकांनी टीका केली. पण आवश्यकता संपली तेव्हा लात मारून बाहेर काढण्याचं कामपण केलं. कारण काश्मीरमधील कलम 370 आपल्याला घालवायचं होतं. अंतिम स्वप्न तेच होतं. अजून पाकव्याप्त काश्मीर बाकी आहे ते आपलं अंतिम ध्येय आहे”, असं देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले.

“आपला मंत्र, विश्वास पक्षावर, नेतृत्वावर, क्षमतेवर यावरच भाजप मोठा झालाय. आता आपल्याला विष पचवायचं नाहीय. पण महाविजयासाठी कडू औषध जरी घ्यायची गरज पडली तर घ्यायचं. आपल्याला संयमाची गरज आहे. नेहमी विचार दूरचा करायाचा असतो, त्यासाठी संयम आणि विश्वास आवश्यक आहे”, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिला.

“मावळ्यांचा महाराजांवर पूर्ण विश्वास होता. छत्रपतींनी अफजलखानाचा संयम ठेवून कोथळा काढला. मी उदाहरण देत आहे. इकडे कोणीही अफजलखान नाही. नाहीतर मीडिया चालवतील की कोण अफजलखान? पण आम्ही सर्व मावळे आहोत”, असं फडणवीस म्हणाले.