महामारीतल्या या गर्दीचं करायचं तरी काय? मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या धबधब्यावर जल्लोष

| Updated on: Jun 27, 2021 | 8:32 PM

विशेष म्हणजे पोलिसांनी या धबधब्याला दिवसभरात एकदाही भेट दिली नाही (Huge crowd at mumbra devi mountain waterfall in Thane).

महामारीतल्या या गर्दीचं करायचं तरी काय? मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या धबधब्यावर जल्लोष
कोरोना संपणार कसा? मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या धबधब्यावर तुफान गर्दी
Follow us on

ठाणे : कोरोनाच्या या महाभयानक संकटात अनेकांनी जवळचे माणसं गमावले. मात्र, अद्यापही काही नागरिकांना परिस्थितीचं गांभीर्य समजलेलं नाही. ते कोरोना संकट गेलं या अविर्भात मस्तपैकी मजामस्ती करत आहेत. नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करत आहेत. त्याचाच प्रत्यय हा मुंबईपासून जवळ असलेल्या ठाण्यातील मुंब्रा देवी डोंगरवर असलेल्या धबधब्याजवळ आला. या धबधब्यावर नागरिकांची दिवसभर गर्दी बघायला मिळाली. विशेष म्हणजे पोलिसांनी या धबधब्याला दिवसभरात एकदाही भेट दिली नाही (Huge crowd at mumbra devi mountain waterfall in Thane).

ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे धबधब्यावर न जाण्याचे निर्देश

ठाण्यातील मुंब्रा येथे मुंब्रा देवी डोंगरावर अतिशय नयनरम्य अशा धबधब्याकडे तिथून जाणारे सर्व जण नेहमी आकर्षित होत असतात. एवढंच नाही तर पावसाळ्यात दररोज विशेष करून सुट्टीच्या दिवशी या धबधब्यावर पर्यटक प्रचंड गर्दी करतात. पण सध्या करोना संकटाचा काळ असल्यामुळे राज्यात कलम 144 म्हणजेच जमावबंदीचा आदेश लागू आहे. शिवाय ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ठाण्यातील सर्वच धबधबे, नद्या, तलाव आणि पर्यटन स्थळे या सर्वच ठिकाणी नागरिकांना जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे (Huge crowd at mumbra devi mountain waterfall in Thane).

नियमांचं उल्लंघन, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

प्रशासनाचे निर्बंध असताना देखील मुंब्रा देवी डोंगरातील धबधब्यावर आज सकाळपासूनच नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. आताही या धबधब्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असून नागरिक अजूनही या धबधब्याचा आनंद घेत आहेत. धक्कादायक म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत. एकाही नागरिकाने मास्क घातलेला नाही. त्यामुळे मुंब्र्यात जमावबंदीचे आदेश किंवा पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई आदेश लागू होत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

कोरोना संपणार कसा?

एकीकडे डेल्टा प्लस या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे अनेक ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये ठाणे जिल्हादेखील असून मुंब्रा शहरदेखील आहे. तरीही मुंब्र्यातील धबधब्यावर दिवसभर गर्दी बघायला मिळाली. विशेष म्हणजे पोलिसांनी या ठिकाणी साधी भेट देखील दिली नाही. कारवाई करणं तर फार लांबची गोष्ट. जर अशा पद्धतीने नागरिक कायदा मोडून महामारीच्या काळात एकत्र जमत असतील आणि कोरोना संदर्भातले कोणतेही नियम पाळत नसतील तर करोना कधीच संपणार नाही याचं हे जिवंत उदाहरण आहे.

हेही वाचा : 

कोरोना रुग्णसंख्येत घट होऊनही महाराष्ट्रात निर्बंध का? तुमच्या सर्व शंकांची A to Z उत्तरे

दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी, डेल्टा प्लसचा धोका, निर्बंधात बदल, अकोल्यात काय सुरु काय बंद?