…तर आम्ही रेल्वे रोको आंदोलन करु, कोकण रेल्वे प्रवासी संघाचा ठाकरे सरकारला इशारा

| Updated on: Sep 02, 2021 | 5:03 PM

"गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात राज्य सरकारने अटी आणि नियमांचे विघ्न आणल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे", अशी भूमिका कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने मांडली आहे.

...तर आम्ही रेल्वे रोको आंदोलन करु, कोकण रेल्वे प्रवासी संघाचा ठाकरे सरकारला इशारा
कोकण रेल्वे
Follow us on

ठाणे :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात राज्य सरकारने अटी आणि नियमांचे विघ्न आणल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे”, अशी भूमिका कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने मांडली आहे. कोरोना आरटीपीसीआर चाचणी अहवाल किंवा दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र बाळगण्याच्या अटीबद्दल कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने विरोध दर्शविला आहे. तसेच येत्या 5 सप्टेंबरपर्यंत सरकारने गणेशभक्तांना नियमात मुभा न दिल्यास 6 सप्टेंबरला रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा कोकण रेल्वे प्रवाशी संघाने ठाण्यात दिला आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघाचा नेमका विरोध कशाला?

गणेशोत्सव म्हणजे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष सोहळा असतो. या पाश्वभूमीवर कोकणात जाण्यासाठी कोकणवासीय सज्ज झाले आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे गावी जाता आले नाही. दुसरीकडे यंदा कोरोना काहीसा ओसरु लागल्याने अनेकांनी तीन महिने आधीच रेल्वेचे आरक्षण केले. त्यामुळे यंदा गणेशोत्सवाला कोकणात गावी जाता येणार अशा आनंदात सर्वजण होते. पण मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने राज्य सरकारने 23 ऑगस्ट रोजी नवीन अटी व नियम लागू केले. त्याच नियमांना प्रवासी संघाचा विरोध आहे.

नव्या नियमांमध्ये नेमकं काय म्हटलंय?

नव्या नियमांनुसार कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र आणि लसीकरणाचे दोन डोस झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोकणवासीयांच्या आनंदावर पुन्हा विरझण पडले आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या मार्गातील हे अडथळे दूर करावेत, या मागणीसाठी बुधवारी (1 सप्टेंबर) कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाने सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. तसेच येत्या 5 सप्टेंबरपर्यंत नियम शिथिल न केल्यास 6 सप्टेंबरला रेल रोको आंदोलन करु, असा इशारा दिला. यावेळी कोकण रेल्वे प्रवाशी संघाचे पदाधिकारी राजू कांबळे, सुजित लोंढे, दर्शन कासले, संभाजी ताम्हणकर यांच्यासह आणखी काही पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण रेल्वे प्रवासी संघाचा मुख्यमंत्री कार्यालयावर आरोप

कोरोना सध्या बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. त्यामुळे यंदा तरी अटी व नियमांमध्ये शिथिलता देऊन कोकणचा प्रवास सुरळीत करण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे पाठवून केली होती. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाने हे प्रकरण मदत व पुनर्वसन खात्याकडे वर्ग करुन टोलवाटोलवी सुरु केल्याचा आरोपही कोकण रेल्वे प्रवाशी संघाने केला आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना निर्बंधातून सूट नाही; राजेश टोपे यांचं मोठं विधान

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 30 ऑगस्टला गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी निर्बंध लागू करण्याबाबत मोठं विधान केलं होतं. णेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लॉकडाऊनच्या निर्बंधातून सूट देण्यात आलेली नाही, असं राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केलं होतं. राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली होती. गणेशोत्सावासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना निर्बंधात कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी आणि लसीकरणाची अट असणार आहे. सर्व निर्णय विचार करुन घेण्यात आला आहे. शासनाच्या आदेशाचे जनहितासाठी तंतोतंत पालन करावे, असं आवाहन टोपे यांनी केलं. तसेच चाकरमान्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस अनिवार्य करण्यात आले असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, धनजंय मुंडेंकडून शेतकऱ्यांना धीर

गॅस सिलिंडर 9 महिन्यांत 190 रुपयांनी महागला, पाहा तुमच्या शहरातील भाव