
अमेरिका–इस्रायल–इराण संघर्ष याचे पडसाद आता भारतातही उमटताना दिसत आहेत. गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना गॅससाठी रांगा लावाव्या लागत आहेत. या तुटवड्याचा परिणाम आता थेट स्वयंपाकघरावर झाला असून गॅस मिळत नसल्याने अनेक गृहिणी इलेक्ट्रिक शेगडीकडे वळताना दिसत आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील दुकानांमध्ये इलेक्ट्रिक शेगडींची मागणी अचानक वाढली असून महिलांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. मध्यपूर्वेतील तणाव आणि अमेरिका–इस्रायल–इराण संघर्ष याचा परिणाम आता भारतातील दैनंदिन जीवनावरही जाणवू लागला आहे. गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने अनेक शहरांमध्ये नागरिकांना गॅस मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत.
यापूर्वी घरगुती गॅस संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एजन्सीकडून सिलेंडरचा पुरवठा होत होता. मात्र सध्या परिस्थिती बदलली असून सिलेंडर मिळण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये स्वयंपाक करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा परिणाम केवळ घरगुती ग्राहकांवरच नाही तर व्यावसायिकांवरही झाला आहे. हॉटेल आणि खानावळ चालवणाऱ्या व्यावसायिकांना देखील गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्याने काही ठिकाणी हॉटेल बंद करण्याची वेळ आल्याचेही समोर येत आहे.
स्टॉकही कमी पडू लागला
दरम्यान, या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली असून इलेक्ट्रिक शेगडी हा पर्याय मोठ्या प्रमाणात निवडला जात आहे. कल्याण परिसरातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये इलेक्ट्रिक शेगडी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे.दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, अचानक वाढलेल्या मागणीमुळे इलेक्ट्रिक शेगडींची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असून काही ठिकाणी स्टॉकही कमी पडू लागला आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत इलेक्ट्रिक शेगडींची मागणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवे आर्थिक संकट
व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल चालकांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. सरपणासाठी आरा मशीनवर मागणी वाढली गट्टूचे दर 6 वरून थेट 8 ते 10 रुपये किलोवर गेले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा तीव्र होत असल्याचे चित्र समोर येत आहे. गॅस मिळत नसल्याने अनेक हॉटेल चालकांना आता चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शहरातील आरा मशीनवर सरपण घेण्यासाठी मोठी गर्दी होत असून गट्टूच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. पूर्वी सहा रुपये किलोने मिळणारे गट्टू आता आठ ते दहा रुपये किलो दराने विकले जात असल्याने हॉटेल व्यावसायिकांसमोर नवे आर्थिक संकट उभे राहिले आहे.