
बदलापूर : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी अडवलं, की किमान 100 रुपयांची पावती फाटणारच, हे ठरलेलं असतं. मात्र बदलापुरात आज काहीसं उलटं चित्र पाहायला मिळालं. कारण नियम मोडणाऱ्यांना पावती नव्हे, तर चक्क गुलाबाचं फूल देत वाहतूक पोलिसांनी गोड समज दिली. बदलापूर शहरात आज वाहतूक पोलिसांचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं. याला निमित्त होतं ते “नो चलान डे” चं.
बदलापूरच्या गांधी चौक आणि स्टेशन परिसरात आज सकाळपासून वाहतूक पोलिसांची फिल्डिंग लागली होती. नेहमीप्रमाणे एखादा नियम मोडणारा वाहनचालक दिसला की त्याला बाजूला घेतलं जात होतं. मात्र त्याच्याकडून दंड घेतला जात नव्हता. तर चक्क गुलाबाचं फूल देऊन त्याच्यासोबत फोटोसेशन केलं जात होतं आणि पुढच्या वेळी चूक करू नका, अशी गोड समज दिली जात होती.
राज्य सरकारनं वाहतूक विभागाचे नियम बदलले असून आता दंडाची रक्कम सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वाहन चालकांमध्ये जनजागृती करून त्यांना नियम पाळण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं. तर रिक्षा चालकांनाही नियम पाळून रिक्षा चालवण्याचं आवाहन करण्यात आलं. मात्र ही गोड भाषा नियम मोडणाऱ्यांना किती दिवस लक्षात राहते, हेदेखील पाहणं महत्त्वाचं आहे. अन्यथा पुढच्या वेळी मात्र पावती ठरलेली आहे.
ठाणे वाहतूक विभागाच्या वतीनेही आज एक दिवस “नो चलान डे” चं आयोजन करण्यात आलं होतं. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना समुपदेशन यावेळी देण्यात आले व सुधारणा करण्याची एक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. वाहतुकीचे हे नियम वाहनचालकांना माहीत होण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘नो चलन डे’ निमित्ताने ठाण्यातील महत्त्वाच्या 36 ठिकाणी आगळावेगळा उपक्रम राबवत जनजागृती करण्यात आली. (No Challan Day celebrated today by Traffic police in Badlapur)
इतर बातम्या
Ulhasnagar : उल्हासनगरचा ‘चांदनी डान्सबार’ अखेर सील, आतापर्यंत तब्बल 80 वेळा झाली होती कारवाई
Kalyan Crime: एकीला लग्नाचे वचन अन् दुसरीसोबत गाठ बांधण्याच्या तयारीत, कल्याणमधील नवरदेव गजाआड