श्रेयवादावरुन पुन्ह चुरस, दुर्गाडी खाडी पूलाच्या नव्या दोन लेनच्या लोकार्पणाच्या आधीच भाजपची बॅनरबाजी

| Updated on: May 30, 2021 | 11:09 PM

कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून शिवसेना-भाजपमध्ये शाब्दीक चकमक सुरु झाली आहे (Politics over Durgadi new creek bridge credits).

श्रेयवादावरुन पुन्ह चुरस, दुर्गाडी खाडी पूलाच्या नव्या दोन लेनच्या लोकार्पणाच्या आधीच भाजपची बॅनरबाजी
Follow us on

कल्याण (ठाणे) : कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून शिवसेना-भाजपमध्ये शाब्दीक चकमक सुरु झाली आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व सुरु आहे, यात तिळमात्र शंका नाही. आता नवे प्रकरण दुर्गाडी खाडी पूलाच्या दोन लेनचे लोकार्पण कार्यक्रमानिमित्त समोर आलं आहे. लोकार्पणाच्या 24 तास आधीच जुन्या पूलाच्या बाजूला भाजपचे केडीएमसी नगरसेवक वरुण पाटील आणि कोणगाव ग्रामपंचायती तर्फे बॅनरबाजी करण्यात आली आहे (Politics over Durgadi new creek bridge credits).

बॅनरमध्ये नेमकं काय?

बॅनरमध्ये दोन लेनच्या कामाच्या पूर्णत्वासाठी भाजप खासदार कपील पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. भाजपने यामार्फत नव्या पूलाच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दोन लेनचे ऑनलाईन लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राजकीय पदाधिकारी सरकारी अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र लोकार्पणाच्या आधीच भाजपकडून बॅनरबाजीमुळे राजकीय वतरुळात चर्चा रंगली आहे (Politics over Durgadi new creek bridge credits).

दुर्गाडी नव्या खाडी पुलावरील दोन लेन सुरू होणार

आता कल्याणहून भिवंडीचा प्रवास सुस्साट होणार आहे. कल्याणच्या दुर्गाडी खाडीवरील पुलाचे काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे खाडी पुलावरील दोन लेनचं येत्या 31 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षापासून नव्या पूलाचे काम सुरू होते. या सहा पदरी पुलाच्या कामापैकी दोन लेन सुरू होणार आहेत. अतिवृष्टीचा फटका आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे पुलाच्या कामात अडचणी आल्या होत्या. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाराने या पुलाचे काम वेगाने सुरू झाले. त्यामुळे दोन लेनचे काम पूर्ण झाल्याने या सहापैकी दोन लेन सुरू होणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.

एमएमआरडीए क्षेत्रातील भिवंडी-कल्याण शीळ हा रस्ता महत्वाचा रस्ता आहे. हा रस्ता 21 किलोमीटर इतका आहे. या रस्त्यावर अस्तित्वात असलेला दोन लेनचा जुना पूल आत्ता लोकसंख्येच्या मानाने आणि वाढत्या रहदारीमुळे कमी पडत होता. त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे या पुलाला समांतर सहा पदरी पूलाचे काम एमएमएमआरडीएच्या माध्यमातून 2016 साली हाती घेण्यात आले होते.

कामाची संथगती, कंत्राटच रद्द

या पुलाच्या कामामध्ये सुरुवातीला अनेक अडथळे आले होते. सुरुवातीला नेमलेला कंत्राटदार कामात दिरंगाई करीत होता. तसेच खाडीवर हा पूल उभारायचा असल्याने त्याठिकाणी स्पॅनचा आराखडा नव्याने द्यावा लागला. नेमलेला कंत्राटदार संथगतीने काम करीत असल्याने त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले होते. त्यानंतर टी अॅण्ड टी कंपनीला काम देण्यात आले. या कंपनीने कामात गती घेतली होती. मात्र 2019 मध्ये पुलाच्या कामाला अतिवृष्टीचा तडाखा बसला. त्यानंतर कोरोनाचा फटका बसला. त्यामुळे कामाला विलंब होत होता. आता दोन लेन तयार झाल्या आहे, असं एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे यांनी सांगितलं.

चार लेनचं काम प्रगतीपथावर

पुलाच्या दोन्ही लेनचे लोर्कापण झाल्यावर आधी अस्तित्वात असलेला दोन लेनचा पूल आणि नव्या पूलाच्या दोन लेन खुल्या झाल्याने चार लेन उपलब्ध होणार आहेत. उर्वरीत चार लेनचे कामही प्रगती पथावर असल्याचे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले. आज शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाके यांनी नव्या पुलाची पाहणी केली. यावेळी भोईर यांनी हा पूल 31 मे पासून नागरिकांसाठी खुला होणार असल्याची माहिती दिली. या पुलाचा लोकार्पण कार्यक्रम 31 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत, असं सांगण्यात आलं.