गुलाब चक्रीवादळाचा धसका, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा

| Updated on: Sep 28, 2021 | 10:20 AM

गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार बंगालच्या समुद्रात वादळसदृश्य (गुलाब चक्रीवादळ) स्थिती निर्माण होत आहे. (Remnants of cyclonic storm Gulab to bring heavy rain to Thane)

गुलाब चक्रीवादळाचा धसका, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा
gulab cyclone
Follow us on

ठाणे: गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार बंगालच्या समुद्रात वादळसदृश्य (गुलाब चक्रीवादळ) स्थिती निर्माण होत आहे. 1 ऑक्टोबर पर्यंत कोकण किनापट्टीलगतच्या जिल्हयातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे. (Remnants of cyclonic storm Gulab to bring heavy rain to Thane)

27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत कोकण किनाऱ्यावर 40-45 ते 60 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. सदर कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी न जाणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.तसेच सर्व मच्छीमार व समुद्र किनाऱ्यावरील गावे यांना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्यावतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, पाणी साचणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

हेल्पलाईन जारी

दरम्यान ठाणे महापालिकेच्यावतीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री – 1800 222 108 व हेल्पलाईन – 022 25371010 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहनही महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

राज्यात जोर’धार’, बीड, औरंगाबादमध्ये हाहा:कार

दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. बीड आणि औरंगाबादमध्ये तर पावसाने हाहा:कार उडवला आहे. तर नाशिक जिल्ह्याला मंगळवारी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यादृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

अकोला आणि नांदेडमध्येही मुसळधार

अकोला जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहाटे पाच वाजल्यापासून याठिकाणी पाऊस कोसळत आहे. तर नांदेड जिल्ह्यातही साधारण अशीच परिस्थिती आहे. रात्रीपासून नांदेडमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून नांदेड शहर जलमय झाले आहे. तसेच अनेक भागांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे.

जळगावात दोघांचा वीज कोसळून मृत्यू

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असतानाच वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथे मुरखीबाई वागणे 24 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर विटनेर येथे अचानक घरावर वीज पडल्याने सोनाली बारेला या मुलीचा मुत्यृ झाला आहे. याशिवाय, रावेर तालुक्यात वीज पडल्याने तीन लहान मुले भाजल्याची घटना घडली आहे. (Remnants of cyclonic storm Gulab to bring heavy rain to Thane)

 

संबंधित बातम्या:

Weather Alert: बीड, औरंगाबादमध्ये पावसामुळे हाहा:कार; नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, पुढील 24 तास महत्त्वाचे

Weather Alert: पुण्यात घाटमाथ्याच्या परिसरात रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा अंदाज

VIDEO | माझ्या घरातल्यांना माझे गुण कळले नाहीत, परळीतून धनंजय मुंडेंची तुफान फटकेबाजी

(Remnants of cyclonic storm Gulab to bring heavy rain to Thane)