उल्हासनगरात शौचालयाला दरवाजेच नाहीत, नागरिकांवर छत्र्या घेऊन बसण्याची वेळ

| Updated on: Oct 19, 2021 | 3:06 PM

महापालिकेने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या शौचालयाला दरवाजेच नसल्यानं नागरिकांवर चक्क छत्र्या घेऊन शौचाला बसण्याची वेळ आलीये. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उल्हासनगर शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

उल्हासनगरात शौचालयाला दरवाजेच नाहीत, नागरिकांवर छत्र्या घेऊन बसण्याची वेळ
Ulhasnagar Public Toilet
Follow us on

उल्हासनगर : महापालिकेने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या शौचालयाला दरवाजेच नसल्यानं नागरिकांवर चक्क छत्र्या घेऊन शौचाला बसण्याची वेळ आलीये. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उल्हासनगर शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

काही दरवाजे तुटले काही चोरीला गेले

उल्हासनगर शहरातील कॅम्प-2 परिसरात हनुमान नगर हा झोपडपट्टी परिसर आहे. या परिसरात महापालिकेने काही वर्षांपूर्वीच लेखी रुपये खर्चून महिला आणि पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालय उभारलं. मात्र, या शौचालयाचे दरवाजे काही दिवसातच तुटले, तर काही चोरीला गेले. त्यामुळे इथल्या रहिवाशांनी स्थानिक नगरसेवकांपासून ते महापालिकेपर्यंत सगळीकडे तक्रारी केल्या. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे इथल्या नागरिकांना आता दरवाजांअभावी चक्क छत्री घेऊन शौचाला बसावं लागतंय.

दररोज सकाळी इथले नागरिक एका हातात पाण्याचा डबा, तर दुसऱ्या हातात छत्री घेऊन शौचाला जातात. धक्कादायक बाब म्हणजे पुरुष आणि महिला अशा दोन्ही शौचालयांची हीच अवस्था आहे.

तात्काळ संबंधित शौचालयाची दुरुस्ती केली जाईल, महापालिकेचे आश्वासन

या सगळ्याबाबत आम्ही उल्हासनगर महापालिकेची प्रतिक्रियाही जाणून घेतली. उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना याबाबत विचारलं असता, ते या सगळ्याबाबत अनभिज्ञ असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे तुम्ही सांगताय तसं जर असेल, तर तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित शौचालयाची दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे महापालिकेला शहरातल्या शौचालयाला दरवाजेच नसल्याची बाबही माहीत नसावी, ही शोकांतिका असल्याचं मत व्यक्त होतंय.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहरातली ही अवस्था पाहिल्यानंतर हे शहर नक्की भारतात आहे? की एखाद्या गरीब देशात आहे? असा प्रश्न नक्कीच पडतो. सुमारे 800 कोटींच्या घरात बजेट असलेली ही महापालिका साधे शौचालयांना दरवाजे बसवून देऊ शकत नसेल आणि लोकांना छत्र्या घेऊन शौचालयात बसावं लागत असेल, तर ही परिस्थिती नक्कीच गंभीर म्हणावी लागेल. त्यामुळं आता उल्हासनगर शहरावरही ‘टॉयलेट एक प्रेमकथा’सारखा चित्रपट आल्यावर राज्यकर्ते जागे होतात का? हे पाहावं लागेल.

संबंधित बातम्या :

उल्हासनगरमध्ये थरार ! पैशाच्या वादातून आधी दोघांवर हल्ला, पोलिसांवरही चाकूने वार, आरोपी फरार

अश्लील हावभाव, बिभत्स नृत्य, उल्हासनगरमध्ये डान्स बारवर कारवाई, 17 बारबाला ताब्यात