Girls Death By Snake Bite : आश्रम शाळेतील तीन मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर सरकारने घेतले काही महत्वाचे निर्णय
Girls Death By Snake Bite : दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी अशी तीन मृत विद्यार्थिनींची नावं आहेत. दीपिका मदवी, कविता किरंगा आणि समृद्धी नैताम या अन्य तीन विद्यार्थिनींवर गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी एक दुर्देवी घटना घडली . धानोरा तालुक्यातील जपतलाई येथे एका आश्रम शाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. विद्यार्थींनी रात्री झोपेत असताना ही घटना घडली. त्यावर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आज बोलले. “तीन मुली दगावल्या आहेत. तीन मुलींवर उपचार सुरु आहेत. अनुदानित शाळेची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल” असं अशोक उईके यांनी सांगितलं. “आदिवासी विकास विभागाचा निरीक्षक प्रत्येक महिन्याला शाळा तपासेल. महाराष्ट्रात अनुदानित आश्रम शाळा कार्यरत आहे. त्या सर्व शाळांची त्रयस्थ संस्थेंकडून चौकशी करुन तपासणी केली जाईल. आज यासंदर्भात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासमोर चर्चा झाली” अशी माहिती अशोक उईके यांनी दिली.
“अनुदानित आश्रम शाळेत प्रकार घडला त्यात मुख्याध्यापक, शिक्षक नव्हते फक्त दोन कर्मचारी होते. संस्थेवर तात्काळ कारवाई करण्यात येईल. काल चर्चा केली असता, अनुदानित आश्रमांचे मूल्यमापन करत व्यवस्था नसलेल्या शाळांवर कारवाई करण्यात येईल” असं अशोक उईके यांनी सांगितलं. “1992 पासून गडचिरोली जिल्ह्यातील जलतराईत ही आश्रम शाळा आहे. या शाळेचे संचालक खासदार राहिले आहेत, आमदार राहिले आहेत. तुम्ही त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत” असं अशोक उईके म्हणाले.
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत
दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी अशी तीन मृत विद्यार्थिनींची नावं आहेत. दीपिका मदवी, कविता किरंगा आणि समृद्धी नैताम या अन्य तीन विद्यार्थिनींवर गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी या आश्रमशाळेत शिक्षण घेतात.या घटनेमुळे त्यांच्या मनात भितीची भावना निर्माण झाली आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उइके यांनी या घटनेची गंभीर दखल घेत प्रकल्प अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवलं होतं.
सर्पदंशाची ही घटना रात्री घडली. त्यानंतर वेळेत त्या मुलींना उपचार मिळाले का? हे सर्व तपासातून समोर येईल. म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे. दंश करणारा साप हा मण्यार जातीचा साप होता. जेव्हा तो दंश करतो, तेव्हा मुंगीसारखा दंश झाल्याचे जाणवते. एक नाही तर चार मुलींना सापाने दंश केला असं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं
