Tukaram Mundhe: हे तर पाळलेले उंदीर.., रेस्टॉरंट मॅनेजरचं उत्तर ऐकून तुकाराम मुंढेही चक्रावले
Tukaram Mundhe: महाराष्ट्र एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका रेस्टॉरंटच्या तपासणीदरम्यान घडलेला एक धक्कादायक प्रकार सांगितला आहे. रेस्टॉरंटच्या मॅनेजरने दिलेलं उत्तर ऐकून अधिकारीही चक्रावले होते.

महाराष्ट्रातील अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावर सध्या IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कारवायांची जोरदार चर्चा सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून काम करताना तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांच्या ठिकाणी तपासण्या केल्या जात आहेत. याच कारवाईदरम्यान समोर आलेला एक भन्नाट किस्सा त्यांनी सांगितला आहे. हा किस्सा ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. तुकाराम मुंढे यांनी एका मुलाखतीदरम्यान अन्नसुरक्षा तपासणीतील अनुभव सांगताना एका रेस्टॉरंटचा उल्लेख केला. एफडीएच्या अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर आढळले. मात्र, अधिकाऱ्यांनी याबाबत रेस्टॉरंटच्या मॅनेजरला जाब विचारला असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून अधिकारीही चक्रावले. मॅनेजरने या उंदरांना चक्क ‘हे तर आमचे पाळलेले प्राणी’ असल्याचं सांगितलं, असा किस्सा मुंढे यांनी सांगितला.
याविषयी त्यांनी सांगितलं, “जेव्हा आमची टीम स्वच्छता तपासण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली, तेव्हा तिथे सर्वत्र उंदीर धावत होते. जेव्हा अधिकाऱ्यांनी मॅनेजरला जाब विचारला आणि किचनमध्ये काय चाललंय असं विचारलं, तेव्हा मॅनेजरने कोणताही संकोच न दाखवता स्वत:चा बचाव करत सांगितलं, हे काही घाणेरडे प्राणी नाहीत, तर रेस्टॉरंटचे पाळीव उंदीर आहेत.”
तुकाराम मुंढे यांनी या घटनेचा उल्लेख करताना अन्नसुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास केवळ कारणं सांगून सुटका होणार नाही, असा स्पष्ट संदेश दिला. एखादी चूक अनवधानाने झाली असेल तर संबंधितांना ती दुरुस्त करण्याची संधी दिली जाऊ शकते. मात्र, नियमांचं उल्लंघन झाल्यानंतर केवळ सबबी किंवा कारणं पुढे करून कारवाई टाळता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
याच कठोर भूमिकेमुळे तुकाराम मुंढे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली FDA कडून मोठ्या प्रमाणावर तपासण्या सुरू असून, काही आस्थापनांवर परवाने निलंबित करण्यासारखी कारवाईही करण्यात आली आहे. 26 मे 2026 रोजी FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दोन महिन्यांत त्यांच्या पथकाने 3,000 हून अधिक तपासण्या केल्या असून जवळपास 165 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र FDA च्या कारवायांमुळे अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एक्सपायर्ड खाद्यपदार्थांवरील तारीख बदलण्यापासून ते अस्वच्छ स्वयंपाकघरांपर्यंत विविध प्रकरणांवर कारवाई केली जात आहे.