
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. यात तब्बल 18 जणांना आपले प्राण गमवावे लागले. प्रयागराजमधील महाकुंभाला जाण्यासाठी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी झाली होती. यानंतर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तर सन्मित्र महिला बँक रौप्य महोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री आणि पालकमंत्री यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. तसेच कोल्हापुरातील जीबीएस सिंड्रोम रुग्णाचा दुसरा बळी गेला आहे. दोनेवाडीतील एका 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
धाराशिव- सोलापूर तुळजापूर महामार्गावरती तामलवाडी टोल नाक्याजवळ कारमधून अडीच लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. हे ड्रग्स मुंबई येथून विक्रीसाठी तुळजापूर येथे आणण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले
धाराशिवच्या तुळजापूरमध्ये आज दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई येथील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेंडणेकर यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले. धाराशिव न्यायालयातील 1540 दिवाणी खटले तुळजापूरच्या न्यायालयात वर्ग करण्यात आले.
अहिल्यानगर पुणे महामार्गावर चास गावाजवळ डिझेल टँकर उलटला आहे. त्यानंतर टँकरमधील हजारो लिटर डिझेल रस्त्यावर आले. टँकर उलटल्यानंतर नागरिकांची डिझेल घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. दुसरीकडे नगर पुणे रोडवर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा या अपघातामुळे लागल्या.
जुन्नरमध्ये अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सत्र न्यायालयाची स्थापना व्हावी अशी जुन्नर तालुका बार असोसिएशनची अनेक वर्षांची मागणी होती. त्याच सोबत स्वर्गीय वल्लभ बेनके हयात असताना त्यांनी देखील त्याचा पाठपुरावा केला. तसेच अनेक मान्यवरांनीही या मागणीचा पाठपुरावा केला होता. अखेर आता ती मागणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे सर्वांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत जुन्नरकरांसाठी न्यायिक इतिहासातील एक क्षण असल्याचं म्हटलं आहे.
शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार भरणार आहे. त्यांनी स्वत: याबद्दलची माहिती दिली आहे. 24 फेब्रुवारी रोजी हा जनता दरबार भरवला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान ठाण्यात हा जनता दरबार भरवणं म्हणजे कोणाशीही स्पर्धा करण्याचा विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
बदलापूरमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळेल असा विश्वास भाजप आमदार किसन कथोरेंकडून व्यक्त करण्यात आला आहे. विधानसभेत भाजपनं आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे बदलापूरमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास कथोरे यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेने माझ्या क्षमतेनुसार संधी दिली नाही, असं मी म्हणालो नाही. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही, असे उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जुन्नर तालुक्यात दौऱ्यावर आहेत. जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र आणि दिवाणी न्यायालयांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर प्रथमच अजित पवार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील तळई गावातील दोन घरांना मध्यरात्री भीषण आग लागली. आगीत घरातील संपूर्णतः संसार उपयोगी वस्तू ,कपडे, अन्नधान्य व कपाटात असलेले दाग- दागिन्यांसह पैसे जळून खाक झाले आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समोर आले नाही.
प्रयागराज येथील कुंभमेळ्यात जाता न आलेल्या भाविकांसाठी नागपूर येथे जलकुंभाचा वर्षाव करण्यात येणार आहे. रेशीमबाग मैदान येथे हा कार्यक्रम होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आरती केली.
कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश बीड कोर्टाने दिले आहेत. बीडच्या मोक्का कोर्टाने याविषयीचा निकाल दिला.
महाराष्ट्रातही आम्हाला या गोष्टी सहन कराव्या लागल्या, उद्धव ठाकरे गटाचे ते दुःख पुन्हा ओठांवर आले. विधानसभा असो की लोकसभा निवडणूक असो, त्यावेळी वाटाघाटीत बऱ्याच हातीशी असलेल्या जागांवर पाणी सोडावे लागल्याचे यापूर्वी सुद्धा ठाकरे गटाने स्पष्ट केले होते. तोच उमाळा पुन्हा आल्याचे दिसून आले. संजय राऊत यांनी याविषयीचे भाष्य केले.
तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती द्या, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. त्यांनी या विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. ते पुन्हा मुंडेंविरोधात आक्रमक दिसले.
पुणे पालिकेची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली… पेठा आणि छत्रपती शिवाजीनगर परिसरातील पाईपलाईन फुटली…
एका अधिकाऱ्यासह 7 पोलिसांवर 100 ते 150 जणांकडून हल्ला… आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथाकावर गोळीबार आणि हल्ला…
शिंदेंच्या शिवसेनाचा शत्रू कोण हे त्यांनी ठरवायला हवं… ठाकरेंवर टीका करणं नैतिकतेला धरुन नाही… मातोश्रीवरील बैठक अचानक ठरली… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
हरियाणात आप आणि काँग्रेसची युती झाली असती तर निकाल वेगळा असता…. राहुल गांधींची आप – काँग्रेस युती होण्याची इच्छा होती… अरविंद केजरीवाल यांनी युती होऊ दिली नाही… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
चंद्रपूर :- सन्मित्र महिला बँक रौप्य महोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपुरात दाखल होणार आहेत. केंद्रीय मंत्री- पालकमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधीही या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. अल्प काळात तिसऱ्या वेळेस मुख्यमंत्री जिल्ह्यात दाखल होणार आहेत. मंत्रीपद नाकारल्यानंतर जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह स्टेज शेअर करणे दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टाळले आहे. आज मुनगंटीवार प्रियदर्शिनी सभागृहात कार्यक्रमाला येतील का याकडे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर : कोल्हापुरात जीबीएस सिंड्रोम रुग्णाचा दुसरा बळी गेला आहे. दोनेवाडीमधील 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जीबीएस सिंड्रोमचा गेल्या तीन दिवसातील दुसरा बळी आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली आहे.
अमरावती जिल्ह्यासह राज्यात तूर खरेदीचे शासनाचे आदेश दाखल झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात नाफेडची 20 केंद्रावर तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावर्षी राज्यात 2 लाख 97 हजार 430 टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे. या हंगामात सुमारे 12 लाख हेक्टरपर्यंत तुरीची लागवड करण्यात आली. एकट्या अमरावती जिल्ह्यात शासनाचे वतीने 39.694 टन तूर खरेदी होणार आहे.
नाफेडचे तुरीचे शासकीय भाव 7550 रुपये भाव आहेत. तूर खरेदीला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाफेडच्या वतीने तूर खरेदी न झाल्याने शेतकऱ्याचे प्रतिक्विंटल चारशे ते पाचशे रुपये नुकसान झाले आहे.
पुणे : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वडगांव मावळात दोन मोटरसायकल स्वारांच्या धडकेत झालेल्या अपघातात एक ठार झाला आहे. तर तीन गंभीर जखमी झाले आहे. या जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती वडगांव पोलीसांनी दिली आहे. ललित सासावडकर हा विरुद्ध दिशेने स्प्लेडंर मोटारसायकल चालवत होता. तर लोणावळ्यावरून पुण्याच्या दिशेला बुलेटवरून दोन तरुण जात असताना दोन्ही वाहनांची एकमेकांना जोरात धडक बसली. यात स्प्लेडंर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाले. घटनास्थळी वडगांव मावळ पोलीस दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.