
नाशिकमध्ये आजपासून मनसेच 3 दिवसीय राज्य शिबीर होणार आहे. या शिबिराला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. राज्यातील सर्व प्रदेश सरचिटणीस, उपाध्यक्ष, शहरप्रमुख जिल्हाध्यक्ष शिबिराला उपस्थित राहणार आहेत. इगतपुरी येथील रिसोर्टमध्ये शिबिर पार पडणार आहे. दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आज सायंकाळी शिवसेना शिंदे गटाची पदाधिकारी बैठक होणार आहे. यामुळे दादरच्या शिवसेना भवन परिसरात शिंदे गटाची बॅनरबाजी करत शक्तिप्रदर्शन केले आहे. भाजपने पक्षविस्तारासाठी नवी खेळी सुरु केली आहे. भाजपने बचत गटांना लक्ष केले आहे. कल्याण-डोंबिवलीत ‘आई एकवीरा’ बचत गटासह शेकडो महिलांनी भाजपमध्ये पक्ष केला. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
पुण्याच्या चाकण परिसरातील 19 गावे, आळंदी,पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहराला वरदान ठरलेल्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण 65 टक्के भरले आहे. त्यामुळे आता धरणातून लवकरच पिंपरी-चिंचवड शहरालाही पाणीपुरवठा सुरू होणार आहे. यावर्षी मे महिन्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात मे महिन्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मेढा येथे आज शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. जावळी तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे 80 टक्के पेरण्या रखडल्या असून या पावसामुळे सोयाबीन भुईमूग घेवडा ज्वारी पिकांची पेरणी न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याने ही मागणी करण्यात आली आहे.
गेल्या विधानसभा निवडणूकीत मारकडवाडी गावात चुकीते मतदान झाल्याने तहसीलदार यांनी पत्र देण्यात आले होते. त्यानंतर 3 डिसेंबर 2024 रोजी गावात बॅलेट वर मतदान घेण्याचे ठरवले होते, मात्र प्रशासनाने ते होऊ दिले नाही. यामुळे आता मारकडवाडी सरपंच रंजीत मार्कंड यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा येवला येथे सकल मराठा समाज, तसेच विविध संघटनांच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. या निषेधासाठी आयोजित आंदोलनात व निवेदनप्रसंगी अनेक सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मुंबई उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात
मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली, मालाड आणि अंधेरी भागात मुसळधार पाऊस
मुंबई उपनगराला पुन्हा पावसानं झोडपलं
आचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ
माथेरानमध्ये एका ई रिक्षावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे, या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. माथेरान येथील महात्मा गांधी मार्ग परिसरात ही घटना घडली आहे. रिक्षावर भलं मोठं झाडं कोसळलं, या घटनेत रिक्षाचं देखील मोठं नुकसान झालं आहे.
भाजपच्या करमाळा शहराध्यक्षांवर हल्ला
भाजपचे करमाळा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर हल्ला
आठ ते दहा जणांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती
कोयत्याने व काठ्याने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती
हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट
करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु
बुलडाणातून मोठी बातमी समोर आली आहे. रुग्णालयात राडा आणि ज्युनिअर डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्यावर मेहकर पोलिसात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लक्ष्मण जाधवसह इतर आठ ते दहा आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र मनसे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव आणि इतर आरोपी फरार आहेत.
करमाळा भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला आहे. आठ ते दहा जणांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. कोयत्याने आणि काठ्याने मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
करमाळा पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात आज 14 जुलै रोजी शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. येत्या दिवसात शिवसेना पक्षाची पक्षांतर्गत निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे या निवडणुकीबद्दल माहिती देणार आहेत. तसेच शिंदे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने देखील संबोधित करणार आहेत.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी तीन च्या सुमारास विचित्र अपघात घडला. एका आयशर टॅम्पोने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या अल्ट्रो कार आयशर टॅम्पोवर धडकली. तसेच अल्ट्रो कार त्यापाठोपाठ दोन कन्टेनर मागून धडक दिली यात तीन वाहनांचा नुकसान झालं. सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही. मात्र या अपघातामुळे मुंबईहून गुजरातलाला जाणाऱ्या लेनवर दोन किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.
शिवसेना (उद्धव ठाकरे) राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशी अहवालावर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रियांका यांनी विमान अपघाताचा अंतरिम तपास अहवाल ज्या पद्धतीने प्रकाशित करण्यात आला त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतात अधिकृतपणे प्रसिद्ध होण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये (द वॉल स्ट्रीट जर्नल) या अहवालाचे संवेदनशील भाग प्रकाशित झाले हे अत्यंत चिंताजनक आहे.
गुजरातमधील बारवाला येथील एसडीएम संजय चौधरी म्हणाले, “काल रात्री क्रॉस-वे ओलांडण्याचा प्रयत्न करताना एक एर्टिगा कार नदीत पडली. कारमध्ये 7 लोक होते, त्यापैकी 4 लोक त्यावेळी पाण्यातून बाहेर आले आणि 3 लोक कारसह वाहून गेले. यापैकी 2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि एक व्यक्ती अजूनही बेपत्ता आहे. एनडीआरएफची टीम येथे उपस्थित आहे आणि ते त्यांच्या उपकरणांसह पाण्याखाली शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.”
हरियाणा आणि गोवा, तसेच लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन राज्यपाल नियुक्त केले आहेत. असीम कुमार घोष यांची हरियाणाच्या राज्यपालपदी, माजी केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जम्मू आणि काश्मीरमधील भाजप नेते कविंदर गुप्ता यांची लडाखच्या उपराज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लडाखचे विद्यमान राज्यपाल ब्रिगेडियर बीडी मिश्रा यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.
भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांना अलिकडच्या तेलंगणा दौऱ्यादरम्यान गंभीर संसर्ग झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत आणि एक-दोन दिवसांत ते त्यांच्या अधिकृत कर्तव्यावर परतण्याची अपेक्षा आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार. आरोपी विरोधात दाखल गुन्हा जामीनपात्र असल्याने कोणालाही अटक झालेली नाही. मात्र घटनास्थळावरून पोलिसांनी दोन आरोपीना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर आज प्रतिबंधत्मक कारवाई होईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी म्हटले आहे
अचानक अवजड ट्रक बंद पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, अनेकजण कोंडीत अडकले आहेत. वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, क्रेनच्या साह्याने ट्रक रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले आहे.
जळगावात शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मद्य विक्रेत्यांचा पायी चालत मूक मोर्चा काढला. राज्य शासनाच्या अन्यायकारक वॅट, नूतनीकरण फी व एक्साईज ड्युटी वाढीविरोधात मद्य विक्रेते आक्रमक झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर मधील अंबेडकरवादी पक्ष संघटनांकडून निदर्शने. “महाराष्ट्र सरकारने लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी संविधान विरोधी जन सुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर केले, हे बिल लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवणारे आहे” असं म्हणत याचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मधील अंबेडकरवादी पक्ष संघटनांकडून क्रांती चौकात निदर्शने करण्यात येत आहेत..
आज राज्यातील परमीट रुम्स आणि बार आज बंद राहणार आहेत. राज्यभर आज ड्राय डे असणार आहे. दारूवरील व्हॅट वाढल्यामुळे व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे. करवाढीमुळे व्यवसाय धोक्यात आल्याचा संघटनेनं आरोप केला आहे.
यवतमाळमध्ये बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा यात्रेमुळे पुसद-माहूर महामार्ग सात ते आठ किलोमीटर पर्यंत ट्राफिक लागलं आहे. यात्रेमध्ये शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आजच सुनावणी घ्या अशी मागणी कोर्टात करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट महिन्यातील तारीख देऊ असं म्हटलेलं आहे. तब्बल दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होत होती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरील आजची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली. आम्ही ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करु असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं
“मी आणि माझे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची या संदर्भात भेट घेतली होती. यामध्ये मतदानाचा अधिकार 20 देशांना असतो. या प्रस्तावावर सर्व 20 देशांनी एकमताने निवड केली. राजमुद्रेचा विचार त्यांनी समजून घेतला आणि काळाच्या पुढचा विचार असल्याचं त्यांना दिसलं. या कार्यात मदत केलेले सर्व, पंतप्रधान आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचे मी अभिनंदन करतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“शिवरायांचे 12 गडकिल्ले जागतिक वारसा यादीत. मानांकन टिकवणे हे मोठे आव्हान. सर्वच 20 देशांनी आपल्याबाजूने मतदान केलं. यूनेस्कोकडून शिवरायांच्या कौशल्याची दखल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नामुळे शिवरायांचे गडकिल्ले जागतिक वारसा यादीत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कोयना धरणाचे दरवाजे उद्या उघडण्यात येणार आहे. सहा वक्री दरवाजे एक फूट 6 इंचाने उघडून 5000 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात येणार आहे. पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस आणि धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे दरवाजे उघडण्याचा धरण व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे.
माजी नगराध्यक्ष मंदार केणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह दहा जणांचाही पक्षप्रवेश झाला. भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. पालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला आहे.
नाशिक – गेल्या सहा दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. आदिवासी विभागाच्या आश्रम शाळेतील शिक्षकांची पदे बाह्य स्त्रोत भरण्याचा शासन आदेश रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.
यवतमाळ- बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा यात्रेमुळे माहूर-पुसद मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. राज्यभरातील प्रहार कार्यकर्ते आणि शेतकरी आज रॅलीमध्ये सहभागी झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. ट्रॅक्टर घेऊनही शेतकरी या यात्रेत सहभागी झाले आहेत.
जळगावातील कांचन नगरात पोलीस दलाने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडणाऱ्या तसंच दहशत माजवणाऱ्या तरुणांची अर्धनग्न अवस्थेत शनिपेठ पोलिसांकडून धिंड काढण्यात आली. ज्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे फोडले, त्याच परिसरातून गोविंदा बाविस्कर आणि संजय सौदागर या दोन्ही तरुणांची कान पकडून अर्धनग्नावस्थेत धिंड काढण्यात आली.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक, गाडीची तोडफोड आणि मारहाण प्रकरणी काल (रविवार) अक्कलकोट पोलीस ठाण्यात दीपक काटे यांच्यासह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांना आज सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
रायगडच्या माणगाव वरून कुंभेकडे जात असलेल्या एसटी बसला निजामपूर जवळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला साइड घेत असताना ही एसटी बस अचानक घसरून पलटी झाली. त्यामुळे हा अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण यात १० प्रवाशी जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. नुकतंच युनेस्कोकडून महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे. या पावसाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आनंदोत्सव साजरा केला.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील केसापुरी गावात काही दिवसांपूर्वी जायकोबा राठोड, रमेश राठोड आणि त्यांचा चुलत भाऊ बाळू राठोड यांच्यात (८ जुलै रोजी) जोरदार वाद झाला. या वादात तलवारी आणि लाठ्या-काठ्यांचा वापर करून मारामारी करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे, ज्यात तलवार स्पष्ट दिसत आहे, तरीही अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. या मारामारीत रमेश राठोड यांच्या डोक्यात तलवारीने वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. या मुख्य घटनेनंतर त्याच गटांमध्ये आणखी चार ठिकाणी मारामारी झाल्याचे व्हिडिओ यापूर्वीच व्हायरल झाले होते. अशा प्रकारे तलवारीने मारामारी करून व्हिडिओ व्हायरल होणे हे जिल्ह्यात दहशत निर्माण करत असून, पोलिसांनी दोन्ही गटांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील अवादा एनर्जी प्रकल्पासमोरील विजेच्या खांबावर दारूच्या नशेत चढलेल्या सांगवी गावातील वसंत केदार या तरुणाने रात्री उशिरा ‘हायव्होल्टेज’ ड्रामा केला. खांबावर चढून त्याने खाली उडी घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तातडीने संपूर्ण वीज कनेक्शन बंद करण्यात आले आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वसंतने पोलिसांकडे गावातील काही लोक आपल्याला त्रास देत असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. हे प्रकरण त्याच्या कौटुंबिक वादातून उद्भवल्याचे समोर आले आहे. अखेर, पोलिसांनी आणि गावातील काही तरुणांच्या मदतीने काही तासांच्या प्रयत्नानंतर वसंतला सुखरूप खाली उतरवण्यात यश आले.
घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी अधिकारी दाखल… आग लागल्याचे कारण अस्पष्ट.. आग आटोक्यात आली असून कुलिंगचे कामं सुरू… सदर घटनास्थळी लागलेली आग आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे…. या घटनेत कोणीही जख्मी नाही…
कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यमंदिरात ‘श्रीमंत दामोदर पंत’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान कीटकांचा प्रचंड उपद्रव झाल्याने प्रयोग थांबवावा लागला…. रंगमंचावरील दिव्यांच्या झोतावर कीटक घोंघावत असल्याने कलाकारांना सादरीकरण करणे कठीण झाले, तर नाटक रंगात आले असताना खंड पडल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. नियमित फवारणीच्या दाव्यांनंतरही ही घटना घडल्याने नाट्यगृहाच्या स्वच्छतेची आणि देखभालीची जबाबदारी ऐरणीवर.
तब्बल दोन वर्षानंतर होणार सुनावणी… केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात केली होती याचिका दाखल… आज सुप्रीम कोर्टात २३ व्या क्रमांकावर प्रकरण… १२ .३० वाजताच्या दरम्यान प्रकरण सुनावणीला येण्याची शक्यता… आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष
महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षीय निवडणुकी संदर्भात या शिबिरात मार्गदर्शन केले जाणार… काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यकारणी पक्षातील पद ही लोकशाही पद्धतीने वाटली जाईल असा निर्णय घेण्यात आला होता…. आता प्रत्यक्षात या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे यासाठी आज दादर येथे हे शिबिर भरवण्यात येणार आहे… पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या शिबिरात मार्गदर्शन करतील… दुपारी ४ नंतर या शिबिराला सुरवात होणार
नागपुरात एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक करण्यात आली. माजी नगरसेवक अजय बुगेवार यांचा मुलगा संकेत बुगेवार याला अटक केली आहे. थार कारने एमडी ड्रग्जची डिलेव्हरी देण्यासाठी गेला असता त्याला अटक झाली.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नागराळ येथे एका विद्यार्थ्यांचा जीबीएस या दुर्मीळ आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली. श्रीनिवास पाटील असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याने नुकतेच बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते.
आषाढी एकादशीच्या पंढरपूरच्या यात्रेनिमित्त एसटी महामंडळाच्या जालना विभागाला यावर्षी 13 जुलैपर्यंत जवळपास दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाला. या काळात 64 हजार भाविकांनी बसेसने पंढरपूरचा प्रवास केला.