
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावेळी विधानसभा आणि विधानपरिषेदत अजित पवारांचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अजित पवारांचा शोक प्रस्ताव सादर केोला. त्यावेळी ते कमालीचे भावूक झाले. राजकारणात माणसं येतात आणि जातात, पण काही माणसं गेल्यावर त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते. आज मी माझा एक दिलदार आणि अत्यंत भरोसेमंद मित्र गमावला आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अजित दादांसोबतच्या राजकीय प्रवासाचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, “आमच्या कारकिर्दीची सुरुवात वेगळी होती, आम्ही कधी एकत्र येऊ असे वाटले नव्हते. दोन सकाळ अशा होत्या ज्यांनी सर्वांना धक्का दिला. पण जेव्हा आम्ही महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्र आलो, तेव्हा मला समजले की अजित दादांसारखा माणूस मित्र म्हणून किती मोलाचा आहे. मुख्यमंत्री म्हणून काम करताना मला प्रशासनाचा अनुभव नव्हता, पण दादांनी एक अनुभवी आणि विश्वासू सहकारी म्हणून मला खंबीर साथ दिली.
अजितदादांसमोर अधिकारीही वचकून असायचे. अनेकदा कळायचे नाही की ते कौतुक करायचे की दम देतात. पण त्यांची शैली होती. अनेकदा त्यांच्या विधानाने ते अडचणीत आले. पण ते बिनधास्त बोलायचे. बेधडक काम करायचे. कारण त्यांच्या मनात पाप नसायचे. अडचणीच्या वेळी त्यांनी राज्याचं अर्थ खातं सांभाळलं. मला कशाचा अनुभव नसताना त्यांनी भरोसेमंद सहकारी म्हणून काम केलं. घड्याळ आणि वेळ… म्हणूनच अजितदादांची ती निशाणी होती की काय, दादा वेळेत यायचे. विषय घेऊन यायचे. काम झालं की लगेच निघायचे, अशा काही आठवणीही उद्धव ठाकरेंनी सांगितल्या.
दादांचं टेबल सर्व गोष्टी काटकोनात असायचे. ही सवय शिवसेनाप्रमुखांनाही होती. माणूस कसा शिस्तीचा असतो. तुम्हाला वाटेल की विषय काय आणि बोलतोय काय. पण काटकोनात गोष्टी असणं, सर्व गोष्टी व्यवस्थित असाव्या, स्वच्छता असाव्या. ही शिस्त असली पाहिजे. ही शिस्त नसेल तर कामकाजही व्यवस्थित होत नाही. अगदी तशीच शिस्त बाळासाहेबांनाही होती. स्वच्छतेचा आणि नीटनेटकेपणाचा त्यांचा आग्रह प्रशासनावर वचक निर्माण करणारा होता. अधिकारी त्यांच्यासमोर नेहमी वचकून असायचे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
अजित दादांच्या निधनाने केवळ पवार कुटुंबावरच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, आर. आर. आबा आणि आता अजित दादा… महाराष्ट्राने ज्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या, ते उमदे नेतृत्व अकाली आपल्यातून निघून गेले आहे. कोरोना काळात राज्याचे अर्थकारण सावरण्यात आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घेण्यात दादांचा वाटा अत्यंत मोलाचा होता. असे मित्र आणि सहकारी पुन्हा मिळत नाहीत,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.