कोरोनाचा घातक अवतार, महाराष्ट्र किती सज्ज? मुख्यमंत्र्यांकडून आढावा

| Updated on: Dec 22, 2020 | 11:47 AM

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन अधिक सतर्क झालं आहे.

कोरोनाचा घातक अवतार, महाराष्ट्र किती सज्ज? मुख्यमंत्र्यांकडून आढावा
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) जिल्हाधिकाऱ्यांसह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. नाईट कर्फ्यूच्या (Night Curfew) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार आहेत. उद्धव ठाकरेंची राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत दुपारी 12:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक होईल. (Uddhav Thackeray review meeting with collectors on Night Curfew)

राज्यातील महानगरपालिका आणि शहरांमध्ये आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचे नवीन रुप, त्या पार्श्वभूमीवर कोणत्या उपाययोजना केल्या, नेमकी कोणती तयारी केली, याचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन अधिक सतर्क झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेला संबोधित करताना पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याची वेळ आणू नका, असं बजावलं होतं. परंतु दोनच दिवसात ठाकरे सरकारवर नाईट कर्फ्यू लागू करण्याची वेळ आली. त्यामुळे रात्रीच्या संचारबंदीच्या पावलांनी मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन येणार का? असा सवाल नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे.

लंडनच्या पाच प्रवाशांनी धाकधूक वाढवली

लंडनहून रात्री दिल्लीत आलेल्या विमानात 5 प्रवासी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. एकूण 266 प्रवाशी त्या विमानात होते. विशेष म्हणजे इंग्लंडमध्येच कोरोनाचा घातक विषाणू सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बातमी भारताची चिंता वाढवणारी आहे

नववर्षाच्या जल्लोषावर बंधनं

नवीन वर्ष उंबरठ्यावर आहे. नाताळपासूनच नववर्षाचा जल्लोष सुरु होतो. या काळात नागरिकांकडून हलगर्जी होऊ नये आणि कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासन सतर्क झालं आहे. दरवर्षी डिसेंबर अखेरीस अनेक जण रात्रभर सेलिब्रेशन करतात. मात्र घराबाहेर एकत्र जमून होणाऱ्या जल्लोषावर मर्यादा यावी, यासाठी अतिरिक्त बंधनं घालण्यात आली आहेत.

युरोपीय प्रवाशांवर निर्बंध

संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सात दिवसांसाठी स्वखर्चाने त्यांना जवळच्या हॉटेलमध्ये संस्थात्मक विलगीकरण करावे लागेल. तर अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. (Uddhav Thackeray review meeting with collectors on Night Curfew)

अन्य देशांमधून महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारुन त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. युरोपीयन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपसाणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

संबंधित बातम्या :

चिंता वाढली! लंडनहून दिल्लीला आलेले 5 प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह

नाईट कर्फ्यूच्या पावलांनी मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन येणार?

(Uddhav Thackeray review meeting with collectors on Night Curfew)