मुंबई महापालिकेतली सत्ता गमावली; मनसे, ठाकरे गट युतीचं आता काय होणार? उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना युतीला मोठं यश मिळालं आहे, त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मनसे सोबतच्या युतीवर प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे.

मुंबई महापालिकेतली सत्ता गमावली; मनसे, ठाकरे गट युतीचं आता काय होणार? उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
uddhav thackeray, raj thackeray
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 17, 2026 | 6:50 PM

राज्याच्या राजकारणात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक नवा प्रयोग पहायला मिळाला, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं शिवसेना शिंदे गटासोबत युती केली. तब्बल वीस वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीसमोर मोठं आव्हान निर्माण करेल. मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचाच महापौर होईल असा अंदाज अनेकांकडून व्यक्त केला जात होता. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला 89 जागा मिळाल्या तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या, मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळालं, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला 65  आणि मनसेला 6 जागा मिळाल्या.

दरम्यान या निकालानंतर आता उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी या निकालावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. साम दाम दंड भेद याही पलिकडे जाऊन त्यांनी या निवडणुका लढवल्या, त्यांनी या निवडणुका अशा पद्धतीने लढवल्या की तो त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. आमच्या उमेदवारांवर दबाव टाकला, काही ठिकाणी आमिष दाखवण्यात आली, काही ठिकाणी जोर जबरदस्ती करून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे  यांनी मनसेसोबत युती केली होती. मात्र आता निवडणूक झाल्यानं युतीचं काय होणार? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना मी आणि राज ठाकरे आम्ही दोघं एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठीच असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  त्यामुळे आता यापुढच्या काही निवडणुकांमध्ये देखील मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती पहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपला 29 महापालिकांपैकी 26 महापालिकेत सत्ता मिळाली आहे.

 

Follow Us