उल्हासनगर दुहेरी हत्याकांडात मोठा ट्विस्ट, तक्रारदारच निघाला आरोपी, अखेर गूढ उकलले
उल्हासनगर दुहेरी हत्याकांडात धक्कादायक वळण आले आहे. सुरुवातीला तक्रारदार असलेला दीपक ठाकूर आता स्वतः आरोपी बनला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, गोळीबारापूर्वी दीपक ठाकूर आणि त्याच्या साथीदारांनी मुख्य आरोपी अजय रावला मारहाण केली होती. या रागातूनच अजय रावने गोळीबार करत दोन जणांची हत्या केली. आता दोन्ही घटनांचा संबंध जोडून पोलीस तपास करत आहेत.

उल्हासनगरमधील कैलास कॉलनी दुहेरी हत्याकांड प्रकरणात आता एक मोठा आणि धक्कादायक खुलासा पोलिस तपासात समोर आला आहे. ज्या दीपक ठाकूर यांनी हत्या आणि गोळीबाराची तक्रार दाखल केली होती, त्यांच्यावरच आता गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासातील माहितीनुसार, गोळीबाराच्या काही मिनिटांपूर्वी गोळीबार आणि हत्येचा आरोपी अजय रावला रस्त्यात अडवून तक्रारदार दीपक ठाकूर यांनी आपल्या साथीदारासह मिळून बेदम मारहाण करण्यात केली होती. या घटनेनंतर संतप्त झालेल्या अजय रावने साथीदारांसह परत येत गोळीबार करत दोन जणांची हत्या केली या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी दीपक ठाकूरसह आठ जणांवर गुन्हा दाखल करत तपासाची दिशा बदलली आहे.
उल्हासनगर कैलास कॉलनीतील गाजलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिस तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोळीबाराच्या घटनेपूर्वी अजय नरेश रावला अडवून बेदम मारहाण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, या प्रकरणी गोळीबारातील तक्रारदार दीपक ठाकूर यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 21 मे रोजी रात्री अजय राव आणि त्याचा मित्र अभय विश्वकर्मा हे मोटारसायकलवरून जात असताना कैलास कॉलनी परिसरात त्यांना अडवण्यात आले. त्यानंतर त्यांना खाली खेचून मारहाण करण्यात आली. याचवेळी दीपक ठाकूर आणि त्यांचे साथीदार घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप आहे.
आईची तक्रार
तक्रारीनुसार, अजय राव याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला तसेच त्याच्या मोटारसायकलीचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर काही मिनिटांतच अजय राव आपल्या साथीदारांसह परत आला आणि परिसरात गोळीबार झाला.या गोळीबारात अनिल चौहान आणि अमन चौहान या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. तर अर्जुन चौहान गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर संपूर्ण उल्हासनगर हादरले होते. अजय रावच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हिललाईन पोलिसांनी दीपक ठाकूर, किशोर चौहान आणि अन्य आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आधीच अनेक आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे.पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या माहितीनुसार, जुन्या वादातून सुरू झालेल्या मारहाणीमुळेच पुढे हा रक्तरंजित गोळीबार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आता या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध तपासून पुढील कारवाई केली जात आहे.
