माझ्या हत्येचा कट रचला… दुसरा CCTV समोर; उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची मोठी अपडेट काय?
उल्हासनगर गोळीबार प्रकरणात नवा CCTV समोर आला असून, हॉटेल व्यावसायिक दीपक ठाकूर यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याचे दिसत आहे. ठाकूर यांनी भाजप नगरसेवक प्रधान पाटील आणि साथीदारांवर आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रधान पाटील यांनी मात्र आरोप फेटाळत CBI चौकशीची मागणी केली आहे.

उल्हासनगरच्या कैलासनगर गोळीबार प्रकरणाने आता नवे वळण घेतलं आहे. गोळीबारानंतर हॉटेल व्यावसायिक दीपक ठाकूर यांच्या कार्यालयाची तोडफोड करणारा दुसरा CCTV समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे हॉटेल व्यावसायिक दीपक ठाकूर यांनीभाजप नगरसेवक प्रधान पाटील आणि त्यांच्या 9 ते 10 साथीदारांवर गंभीर आरोप केले आहेत. तर, नगरसेवक प्रधान पाटील यांनी सर्व आरोप फेटाळत सीबीआय किंवा नार्को टेस्ट करा. माझा यात कोणताही संबध नसल्याचं स्पष्ट केल आहे. दरम्यान, या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केलं असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
उल्हासनगरच्या कैलासनगर परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोळीबार झाला होता. या गोळीबारामध्ये दोन जाणाचं मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. मात्र याप्रकरणात नवे वळण घेतलं आहे. गोळीबारानंतर काहीजण दीपक ठाकूर यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड करत असल्याचेही समोर आले आहे. याचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे. या घटनेनंतर हॉटेल व्यावसायिक दीपक ठाकूर यांनी थेट आपल्यालाच लक्ष्य करण्यात आल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी दीपक ठाकूर यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत 9 ते 10 जणांविरोधात जीवघेणा हल्ला, कार्यालयाची तोडफोड आणि कट रचल्याचा आरोप केला आहे. दीपक यांनी सागर पाटील आणि भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.
वाद सुरू होते
दीपक ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार, 2017 पासून सागर पाटील याच्यासोबत त्यांचे वाद सुरू होते. यापूर्वीही सागर पाटील याच्यावर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. शहरात परतल्यानंतर पुन्हा कट रचून हा हल्ला केल्याचा आरोप दीपक ठाकूर यांनी केला असून आम्ही पोलिसांकडे सर्वांची नावे देत तक्रार केली आहे. भविष्यात आम्हाला काही झाल्यास त्याला जबाबदार हेच लोक असल्याचं दीपक यांनी सांगितलं आहे.
तेव्हा कार्यालयात होतो
मात्र या सर्व आरोपांवर भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. घटनेच्या वेळी आपण आपल्या कार्यालयात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच राजकीय विरोधक मुद्दाम आपले नाव या प्रकरणात ओढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. मात्र नेमकं काय घडलं? हे मला माहिती नाही. जर माझा हात असेल तर सीबीआय किंवा नार्को टेस्ट करा. दोषी आढळलो तर शिक्षा स्विकारेल, असं भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांनी म्हटल आहे.
तपास सुरू
दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी शेखर बिराजदार, बलवीर बिराजदार, अजय राव, अजित शेख, अदालत बद्दीन खान आणि अन्य काही अज्ञात आरोपींविरोधात उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच सागर पाटील याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली. या गोळीबारात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. शेखर बिराजदार आणि अजय राव या मुख्य आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 2020 मधला हा जुना वाद असून त्या वादातून हा गोळीबार झाल्याचं निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितले. यापूर्वी शेखर बिराजदार याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. तर फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, काही व्यक्तींवर संशय व्यक्त केला आहे, त्या अनुषंगाने देखील पुढील तपास सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितल आहे.