मनसेचं पुन्हा खळ्ळखट्ट्याक! अंगावर आला तर… अमित ठाकरे यांची ठोकाठोकीची भाषा; अमराठी रिक्षाचालकांना सज्जड दम

अमित ठाकरे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात मुंबईतील रिक्षा-टॅक्सी संघटना आणि मनसे यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसेचं पुन्हा खळ्ळखट्ट्याक! अंगावर आला तर... अमित ठाकरे यांची ठोकाठोकीची भाषा; अमराठी रिक्षाचालकांना सज्जड दम
अमित ठाकरे
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 23, 2026 | 7:42 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी रेल्वे प्रशासन आणि अमराठी रिक्षाचालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात १ मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे बंधनकारक असल्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. त्यानंतर 4 मे रोजी 15 लाख रिक्षाचालक संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली. आता अमित ठाकरे यांनी “मराठी माणसाच्या किंवा मराठी रिक्षाचालकांच्या अंगावर आलात, तर तुम्हाला रस्त्यावर मारणार,” अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे. तसेच मनसेच्या ‘ठोकाठोकी’च्या भाषेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

रेल्वे प्रशासनाला सज्जड दम

रेल्वे प्रशासनातील मराठी भाषेच्या मुद्द्यावरून अमित ठाकरे यांनी प्रशासनाचे कान टोचले. ते म्हणाले, “रेल्वे प्रशासनात आधी मराठी भाषाच नव्हती. आज मला प्रशासनाला सांगायचे आहे की, आमचे महाराष्ट्रावर कायम लक्ष आहे आणि असेल. तुमच्या परीक्षा कुठे आणि कधी होतात, हे आम्हाला चांगलेच माहित आहे. रेल्वे प्रशासन नेहमी चाचपडून बघत असते, पण आता तसे चालणार नाही.” मुंबईतून मराठी माणसाला बाहेर काढण्याचाच प्रशासनाचा उद्देश दिसतो, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मराठी सक्तीचा निर्णय योग्यच!

राज्य सरकारने रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचे अमित ठाकरे यांनी स्वागत केले. “सरकारने घेतलेला हा निर्णय अगदी योग्य आहे. भाषेची सक्ती करणे अजिबात अडचणीचे ठरणार नाही. ज्यांना संपावर जायचे आहे त्यांनी खुशाल जावे, त्याने काहीही फरक पडणार नाही,” असे म्हणत त्यांनी आंदोलकांना चपराक लगावली.

अमराठी रिक्षाचालकांना सज्जड दम

रिक्षाचालकांच्या नियोजित आंदोलनावर बोलताना अमित ठाकरे यांचा पारा चढलेला पाहायला मिळाला. ते म्हणाले, “ज्यांना आंदोलन करायचे आहे त्यांनी करा, पण जर तुम्ही आमच्या लोकांच्या किंवा मराठी रिक्षाचालकांच्या अंगावर आलात, तर आम्ही तुम्हाला रस्त्यावर मारू. शांतपणे संप करा, कोणालाही फरक पडणार नाही. आमचे मराठी रिक्षाचालक सक्षम आहेत. त्यांनी सांगितले आहे की, गरज पडल्यास उशिरापर्यंत रिक्षा चालवू पण लोकांना त्रास होऊ देणार नाही.”

प्राधान्य फक्त मराठीलाच

“प्राधान्य फक्त मराठी माणसालाच दिले पाहिजे. ज्यांना मराठी येते, त्यांनाही प्राधान्य द्यायला हवे. पण ‘आम्ही मराठी बोलणार नाही किंवा प्रयत्नही करणार नाही’ असा माज दाखवणाऱ्यांना आम्ही सहन करणार नाही,” असे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले.

भाजपवर निशाणा

लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाले होते. त्यामुळे विरोधक हे महाला आरक्षणाच्या विरोधात असल्याचा दावा करत भाजपाने मुंबईत मोर्चाचे आयोजन केले होते. यावरही अमित ठाकरे यांनी टीका केली. “विनाकारण आंदोलन करणे योग्य नाही, आंदोलनासाठी हेतू महत्त्वाचा असतो, जो इथे दिसत नाहीये. भाजपला आपला पराभव पचवता आलेला नाही, त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशी आंदोलने जाणूनबुजून केली जात आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

अमित ठाकरे यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात मुंबईतील रिक्षा-टॅक्सी संघटना आणि मनसे यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us