
Prakash Ambedkar Vs Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्या भूमिकेनंतर आता राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी जरांगे मुंबईत धडक मारणार आहेत. मुंबईत येऊन आझाद मैदानावर ते बेमुदत उपोषण करणार आहेत. आता काहीही झालं तरी आम्ही मागे फिरणार नाही. आरक्षणाचा आम्ही तुकडाच पाडून येणार आहोत, अशी टोकाची भूमिका जरांगे यांनी घेतलेली आहे. एकीकडे मुंबईत गणेशोत्सवाची धूम असताना दुसरीकडे जरांगे यांनी मुंबईत येण्याचे ठरवल्यामुळे आता राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. असे असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांना अनेक महत्त्वाचे सवाल विचारले आहेत. तुम्ही गरीब मराठ्यांच्या नावाखाली श्रीमंत मराठ्यांना पुन्हा पाठिंबा देताय का? असा रोखठोक सवाल त्यांनी केलाय.
मराठा आरक्षणाचा विषय वाढत असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना सवाल केला आहे. मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे यासारखे प्रस्थापित मराठा नेते आहेत. असे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असताना सत्तेत सर्व प्रस्थापित मराठा होते. शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे सर्व प्रस्थापित मराठे सत्तेत होते. तुम्ही निवडणुकीत या श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आणि त्यांना मतदान केले. तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात पण, गरीब मराठ्यांना वंचित ठेवणाऱ्या श्रीमंत मराठ्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात. गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका, अशी थेट टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली.
मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी सरकारविरुद्ध लढत आहात. पण, सरकारमध्ये कोण आहे? आताच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे सारखे प्रस्थापित मराठा आहेत.
अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार असतांना सत्तेत सर्व…
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) August 25, 2025
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्ही श्रीमंत मराठ्यांना पाठिंबा दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुम्ही पुन्हा तीच भूमिका घ्याल आणि गरीब मराठ्यांना मूर्ख बनवाल का? असा सवालही ॲड. आंबेडकरांनी जरांगे यांना विचारला आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मनोज जरांगे नेमके काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.