उन्हाचा भयंकर तडाखा, फरशीवरच शिजला पराठा, पॅनमध्ये तयार झाला डोसा..! काम असेल तरच घराबाहेर पडा
महाराष्ट्राला, विशेषतः विदर्भाला सध्या भीषण उष्णतेने भाजून काढले आहे. अकोल्यात तापमान 46.9°C पर्यंत पोहोचले असून, फरशीवर पराठे आणि डोसे शिजवण्याचे प्रकार समोर आले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी ऐतिहासिक तापमानाचे विक्रम मोडले आहेत.

राज्यात सध्या उन्हाने अक्षरश: भाजून काढलं आहे. विदर्भात तर सूर्य आग ओकताना दिसत आहे. विदर्भातील अकोल्यात तर उष्णतेची प्रचंड लाटच आली आहे. देशातील सर्वाधिक उष्ण शहरात अकोल्याचा समावेश झाला आहे. अनेकांना उन्हाचा प्रचंड त्रास होताना दिसत आहे. घराबाहेरही पडणं मुश्कील झालं असून काम करणंही अवघड झालं आहे. कडक उन्हामुळे कष्टकऱ्यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. आजही अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा हाच सिलसिला कायम राहिला असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
अकोल्याचे तापमान आज तब्बल 46.9 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून मागील काही वर्षांतील उच्चांक गाठला आहे. तर दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. या प्रचंड उष्णतेचा प्रत्यय देणारी एक वेगळीच घटना समोर आली आहे. शहरातील काही ठिकाणी नागरिकांनी थेट गरम फरशीवर बेसनाचा पराठा भाजून दाखवला, तर पॅनमध्ये तांदळाचा डोसा तयार करून उष्णतेची तीव्रता दाखवून दिली. या प्रयोगांमुळे अकोल्यातील तापमान किती धोकादायक पातळीवर गेले आहे, याची जाणीव होते.
अजून दोन दिवस लाटेचे
तर हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस तापमानात विशेष घट होण्याची शक्यता नसून उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडणे टाळावे, पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतात काम करताना महिलेचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात उष्णतेचा वाढता तडाखा आता जीवघेणा ठरत असल्याचं समोर आलं आहे. निमगाव सावा येथे शेतात काम करत असताना एका शेतकरी महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा गावमाळा परिसरातील रुपाली गाडगे या आज सकाळच्या सुमारास शेतात खुरपणीचे काम करत होत्या. याचवेळी अचानक त्यांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली.
घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत कष्टाची कामे टाळावीत, पुरेसे पाणी प्यावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
68 वर्षानंतर बुलढाण्याच तापमान 43°C च्या पुढे
बुलढाणा शहर हे थंड हवेच ठिकाण म्हणून ओळखल्या जात होतं, मात्र आता बुलढाणा हे उष्ण हवेच ठिकाण बनलं आहे. तब्बल 68 वर्षानंतर बुलढाण्याचं तापमान पुन्हा 43. 5 अंश सेल्सिअस इतकं नोंद झाल आहे. आज बुलढाण्यात 68 वर्षानंतर पुन्हा एकदा 43 अंश पेक्षा जास्त सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने दिवसेंदिवस बुलढाणा हे उष्ण हवेचे ठिकाण बनत जात असल्याचं समोर येत आहे. इंग्रजांच्या काळात बुलढाणा हे हिल्स स्टेशन अर्थात थंड हवेच ठिकाण म्हणून ओळखल जात होतं. त्यामुळेच इंग्रजांनी हे जिल्हा मुख्यालय केलं होतं.
तीन दिवसापासून गडचिरोली तापला
गडचिरोली जिल्ह्यात तापमानाचा तडाखा वाढलेला असून सध्या मागील तीन दिवसापासून 42 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. दुपारी 12 वाजेपासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत नागरिकांनी बाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील हा मुख्य इंद्रा चौरस्ता ज्या ठिकाणी सकाळपासून सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची गर्दी पाहायला मिळते. परंतु उन्हामुळे मोजकेच प्रवासी या चौकामध्ये दिसत आहेत.
