साक्षगंधापूर्वीच पसंत केलं, हुंड्याची चर्चा करायची होती, पण त्यांनी लग्न मोडलं; काँग्रेस नेत्याचा प्रकाश आंबेडकर यांना खोचक टोला

| Updated on: Apr 08, 2024 | 9:33 AM

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संजय निरुपम यांच्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांना काढून टाकलं आहे. आता कुठेही जाऊ द्या. चण्याच्या झाडावर जाऊ द्या की हरभऱ्याच्या झाडावर जाऊ द्या. चिखलात रूतून काय करायचं? त्यांना जे करायचं ते करू द्या. आम्हाला त्याच्याशी काहीही घेणंदेणं नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.

साक्षगंधापूर्वीच पसंत केलं, हुंड्याची चर्चा करायची होती, पण त्यांनी लग्न मोडलं; काँग्रेस नेत्याचा प्रकाश आंबेडकर यांना खोचक टोला
त्यांनी लग्न मोडलं; काँग्रेस नेत्याचा प्रकाश आंबेडकर यांना खोचक टोला
Follow us on

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबतची युती तोडली आहे. आंबेडकर यांनी ठाकरे गटासोबतचीही युती तोडली आहे. त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उमेदवारही जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. आंबेडकर यांनी आघाडी तोडल्याची विविध कारणे दिली जात आहेत. त्यावरून आरोपप्रत्यारोपही होत आहेत. या मुद्द्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर खोचक टीका केली आहे. साक्षगंध होण्यापूर्वीच पसंत केल होतं. हुंड्याची चर्चाही करायची होती, पण त्यापूर्वीच त्यांनी लग्न मोडलं, असा चिमटा विजय वडेट्टीवार यांनी काढला आहे.

विजय वडेट्टीवार मीडियाशी संवाद साधत होते. साक्षगंध होण्यापूर्वी पसंत केले होते. त्यांनी लग्नासाठी का नकार दिला? हुंड्यासाठी जे काही अपेक्षित होतं, त्यासाठी चर्चा करायची होती. पण त्यांनी लग्न तोडलं, असं विजय वडेट्टीवार हे आंबेडकरांचे नाव न घेता म्हणाले.

त्यांना संविधान बदलायचंय

नाशिकच्या जागेवरून महायुतीत वाद सुरू आहे. त्यावरूनही त्यांनी टोलेबाजी केली. कोणताही उमेदवार द्या. संघ आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या देशांमध्ये कुठली विचारधारा नाही म्हणून त्यांचे खासदार घटना बदलण्याच्या गोष्टी करतात. त्यांना हे संविधान बदलायचं आहे, त्यासाठी ते कुठलयाही स्तराला जाऊ शकतात, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

जनता ठरवेल

राजा का बेटा राजा नही होगा, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं. त्यालाही वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जहांगिरदार कोणी बनवलं? मावळ्याचा सरदार केला, सरदारचा जहांगिरदार केलं. आता राजा होण्याच स्वप्न पाहत आहेत. ज्यांनी राजा केला त्याच्याच डोक्यावर पाय ठेवून राजा होणं जनता सहन करणार नाही. कोण शिवसेना वाचवते, येणारा काळ आणि जनता ठरवेल, असंही ते म्हणाले.

राऊतांना सल्ला

सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. कुणीही टोकाची भूमिका घेऊन नये. या मुद्द्यावर मार्ग काढू असे नाना पटोले बोलले आहेत. संजय राऊत यानी आघाडी धर्म पाळताना सामंजस्याने भूमिका ठेवावी, असा सल्ला त्यांनी दिला.

गळ्याला फास लागला

एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये जात आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. गळ्याला फास लागला, बिचारे काय करणार? संजय सिंगला फसवत बेजार केलं, या वयात अधिक त्रास सहन करण्यापेक्षा मानसिक त्रासामुळे बदल करण्याची भूमिका घेतली असेल, असं ते म्हणाले.

जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही

अमरावतीवरून बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यात वाद सुरू आहे. त्यावरूनही त्यांनी फटकारे लगावले. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. राजकारण स्वार्थी झाले आहे. राजकारण नासवलं आहे. राणा कशा बचबचं बोलतात. राणा कुणाच्या भरवश्यावर निवडून आल्या ? शरद पवार या जेष्ठ नेत्याचा आशीर्वाद आणि काँग्रेसच्या मतांमुळे त्या निवडून आल्या होत्या. आता राणांची भूमिका बदलली. लोक यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी सांगितलं.