परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
Marathi Language Controversy : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एका परप्रांतीय तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणाने मराठी माणसाला खाद्यपदार्थ देऊ नका असे म्हटल्याचे समोर आले आहे.

रेल्वे कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एका परप्रांतीय तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणाने मराठी माणसाला खाद्यपदार्थ देऊ नका, तसेच भोजपुरी बोलून या, मगच जेवण मिळेल, अशा आशयाचे वक्तव्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या व्हिडिओवरून सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. व्हायरल व्हिडिओमध्ये तरुण भोजपुरी भाषेत बोलताना दिसत असून, रेल्वे कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ घेण्यासाठी भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल असं त्याने म्हटलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील स्थानिकांच्या अधिकारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल
या तरुणाने रेल्वे कॅन्टीनच्या मुद्द्यावरून काही प्रश्न उपस्थित करताना मराठी भाषेचा दाखला दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. मराठी येत नसेल तर खाद्यपदार्थ देऊ नका, असे आवाहन त्याने केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, कधीचा आहे आणि संबंधित तरुण कोण आहे, याबाबतची स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नाही.
बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख
या व्हिडिओमध्ये तरुणाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेचाही उल्लेख केला आहे. बाळासाहेब ठाकरे हे ‘हिंदूहृदयसम्राट’ होते की ‘मराठी सम्राट’ होते, असा सवाल करत त्याने ठाकरे कुटुंबावरही भाष्य केल्याचे दिसून येते. तसेच मराठीचा नेता निवडणुकीत का जिंकत नाही? असं म्हणत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबाबतही त्याने थेट प्रश्न उपस्थित केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सोशल मीडियावर चर्चेला उधाण
या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी संबंधित तरुणाच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे, तर काहींनी भाषेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या वादावर चर्चा सुरू केली आहे. असं असतं तरी व्हायरल व्हिडिओतील दावे आणि त्यामागील संपूर्ण संदर्भाची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे.