वर्ध्यात शेतात चारा कापत होता तरुण, वाघाने हल्ला करून फरफटत नेले… वाचवा, वाचवा ओरडण्याचा आवाज!

| Updated on: Mar 09, 2022 | 4:54 PM

शेतामधील गव्हाच्या पिकात असलेला हिरवा चारा कापत असताना वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात वाघाने शेतकऱ्याला फरफटत नेले. शेतकऱ्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली.

वर्ध्यात शेतात चारा कापत होता तरुण, वाघाने हल्ला करून फरफटत नेले... वाचवा, वाचवा ओरडण्याचा आवाज!
वर्धा येथे वाघाच्या हल्ल्यात युवक ठार.
Image Credit source: tv 9
Follow us on

वर्धा : येथे वाघाच्या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू (Young farmer killed in tiger attack) झाला. कारंजा (घाडगे) तालुक्याच्या कन्नमवार (Kannamwar, Karanja (Ghadge) taluka) येथील ही घटना आहे. लक्ष्मण महादेव हुके (Laxman Mahadev Hooke) (35 वर्षे) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. ही घटना आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. लक्ष्मण हुके हा शेतात बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेला होता. शेतामधील गव्हाच्या पिकात असलेला हिरवा चारा कापत असताना वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात वाघाने शेतकऱ्याला फरफटत नेले. शेतकऱ्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली. नागरिक येत असल्याचे पाहून वाघ पळून गेला तेव्हापर्यंत लक्ष्मणचा मृत्यू झाला होता. लक्ष्मणला आई, वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत.

मजुराचे कुटुंब उघड्यावर

लक्ष्मण उके नेहमीप्रमाणे बुधवारी बकरीसाठी चारा आणायला गेला होता. गावालगत असलेल्या शेतात तो गवत कापत असतानाच अचानक वाघाने त्याच्यावर हल्ला केला. यात त्याच्या शरीराचा मोठ्या प्रमाणात भाग वाघाने खाल्ला. त्यामुळे तो जागीच मरण पावला. बराच वेळ होऊनही तो घरी परत न आल्याने घरच्यांनी याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली. शोधाशोध केल्यानंतर नागरिकांना त्याचा मृतदेह गावालगतच्या गव्हाच्या शेतात आढळून आला. याबाबत तात्काळ वनविभाग व पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी पंचनामा केला. लक्ष्मण उके हा भूमिहीन असल्याने रोजमजुरीचे काम करत होता. या घटनेमुळे त्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची या परिसरातील काही महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

गावकऱ्यांत संतापाचे वातावरण

या परिसरात वारंवार वन्यप्राण्याने हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेकदा शेतकरी व शेतमजूर जखमी होत आहेत. काहींना आपले प्राणही गमवावे लागत आहे. त्यामुळे वनविभागाने ठोस पावले उचलून याबाबत काही व्यवस्था करावी. जनजागृतीकरिता काही ठोस उपाययोजना करावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. मात्र वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात देताना उघड्यावर आलेल्या या भूमिहीन कुटुंबाला जोपर्यंत आर्थिक मोबदला किंवा मृतकाच्या पत्नीला वनविभागात नोकरी असे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात द्यायचा नाही, असा पवित्रा घेण्यात आला होता. पण काही लोकांच्या मध्यस्थीमुळे मृतदेह ताब्यात देण्यात आला. वृत्त लिहेपर्यंत उघड्यावर आलेल्या या कुटुंबाला वनविभागाकडून कोणतीही आर्थिक मदत देण्यात आली नव्हती. चक्क गावालगत असलेल्या शेतातच ही घटना घडल्यामुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

धक्कादायक! गोंदियात सांभाळायला दिले तिनेच केली मुलाची विक्री, आई पाहायला गेली तेव्हा फुटले बिंग

Photo – अकोल्याच्या सातपुडा पर्वतरांगेत वाघोबाचे दर्शन! अमरावतीचे पर्यटक झाले प्रसन्न

सीएनजीच्या दरात मोठी वाढ, देशात सर्वाधिक महाग सीएनजी नागपुरात का?