तीन वर्षांपासून रखडलेल्या आर्वी-तळेगाव रस्ता पूर्ण करण्याच्या मागणीसाठी ठिय्या;टी पॉइंटवर काँग्रेसचे आंदोलन

| Updated on: Jun 15, 2022 | 12:16 AM

पुलगाव देवळी मतदारसंघातील राज्य सरकारच्या अखत्यारितील एक रस्ता पूर्ण होत नव्हता, तो रस्ता पूर्ण करण्यासाठी खासदारांनी होमहवन केल्याचे वृत्त वाचण्यात आले होते. आर्वी तळेगाव रस्ता तीन वर्षांपासून प्रलंबीत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

तीन वर्षांपासून रखडलेल्या आर्वी-तळेगाव रस्ता पूर्ण करण्याच्या मागणीसाठी ठिय्या;टी पॉइंटवर काँग्रेसचे आंदोलन
तीन वर्षांपासून रखडलेल्या आर्वी तळेगाव रस्ता पूर्ण करण्याच्या मागणीसाठी ठिय्या
Follow us on

वर्धाः मागील तीन वर्षांपासून आर्वी ते तळेगाव (Arvi Talegaon Road) मार्गाचे रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्याचे बांधकाम पूर्ण करावे, या मागणीसाठी माजी आमदार अमर काळे (Former MLA Amar Kale)यांच्या नेतृत्वात आर्वी विधानसभा काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस कमिटीच्यावतीने आर्वी-वर्धा मार्गावरील आर्वी येथील टी पॉइंट येथे रस्त्यावर ठिय्या आंदोलन (Congress Andolan) करण्यात आले. तब्बल दोन तास चाललेल्या या ठिय्या आंदोलनाला उपविभागीय अधिकारी व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांनी मध्यस्थी केल्यामुळे तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या अखत्यारित हा रस्ता असल्याने खासदारांची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यांनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन काम मार्गी लावणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

रस्त्यासाठी होमहवन

पुलगाव देवळी मतदारसंघातील राज्य सरकारच्या अखत्यारितील एक रस्ता पूर्ण होत नव्हता, तो रस्ता पूर्ण करण्यासाठी खासदारांनी होमहवन केल्याचे वृत्त वाचण्यात आले होते. आर्वी तळेगाव रस्ता तीन वर्षांपासून प्रलंबीत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

पूजेसाठी लागणारे साहित्य आम्ही आणून देऊ

या रस्त्याकरिता अर्धा तासाचा वेळ द्यावा, पूजेसाठी लागणारे साहित्य आम्ही आणून देऊ, त्याची पूर्ण तयारी करू, फक्त आर्वी तळेगाव रस्ता पूर्ण करण्यासाठी स्वत: येऊन वेळ देत होमहवन करावे. त्या माध्यमातून रस्ता पूर्ण व्हावा, असे आमदार अमर काळे यांनी मत व्यक्त केले आहे.

 नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तीन वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले होते. दरम्यानच्या काळात रस्त्याचे काम मात्र अर्धवटच राहिले होते. या रस्त्याच्या कामासाठी दोन कंत्राटदार बदलण्यात आले आहेत, मात्र 12 किलोमीटर या रस्त्याची आजही दुरवस्था झाली आहे. या मार्गावर अनेक अपघात घडले असून खराब रस्त्यामुळे अनेकांना शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत.

पावसाळ्यात समस्या वाढणार

आर्वी बाजारपेठ असून आवागमन करताना व्यापारी, प्रवासी, नागरिक यांना अनेक अडचणी येत आहेत. मात्र केंद्र सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. रस्ता खोदून ठेवल्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. पुढे पावसाळा असल्यामुळे समस्या वाढणार आहेत.

तडस यांच्या घरासमोर बसून ठिय्या

तात्काळ या रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सात दिवसाच्या आत काम सुरू न झाल्यास 21 जून रोजी वर्धा येथे खासदार रामदास तडस यांच्या घरासमोर बसून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला.