Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात रात्रभर बरसल्या पावसाच्या सरी, 2 नागरिक गेले वाहून, हिंगणघाट-पिंपळगाव मार्ग वाहतुकीकरिता बंद

वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे तालुक्यातील माणिकवाडा मार्गांवरील खडक नदीला पूर आलाय. रात्रीपासून संततधार सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाल्याना पूर आला आहे.

Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात रात्रभर बरसल्या पावसाच्या सरी, 2 नागरिक गेले वाहून, हिंगणघाट-पिंपळगाव मार्ग वाहतुकीकरिता बंद
वर्धा जिल्ह्यात रात्रभर बरसल्या पावसाच्या सरी
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 3:40 PM

वर्धा : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच कहर केलाय. सतत सुरु असलेल्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात रात्रभर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. यामुळे नदी नाले दुभडी भरून वाहत आहेत. जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील मार्गसुद्धा पाण्याखाली आल्याने वाहतुकीसाठी (traffic) बंद झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 363.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दोघे वाहून गेल्याची घटना घडलीय. मंगळवारच्या संध्याकाळपासून सर्वच भागात मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे तळेगाव (Talegaon), आर्वी (Arvi) महामार्गवरील वर्धमनेरी येथील पूल पाण्याखाली आल्याने वाहतूक बंद झाली आहे. वर्धा समुद्रपूर मार्गसुद्धा रात्रीपासून बंद आहे.

48 तास अतिवृष्टीचा इशारा

हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट पिंपळगाव रोडसुद्धा वाहतुकीकरिता बंद आहे. सोबतच हिंगणघाट येनोरा हा रस्तासुद्धा बंद असल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात आणखी 48 तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार सुरु असलेल्या पावसामुळे आलेल्या पुरात सेलू तालुक्यातील सालई पेवठ येथे शेतशिवारातून पुराच्या प्रवाहात संतोष आडे हा इसम वाहून गेला होता. मंगळवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह आढळून आला आहे. पवनूर येथे आलेल्या पुरात 62 वर्षीय शालिक कृष्णाजी पाटील हा गुराखी रात्री वाहून गेल्याची माहिती आहे. त्याचा प्रशासनाकडून शोध सुरु आहे. साध्या पावसाने काही वेळेकरिता उसंत घेतली आहे. मात्र सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने पुन्हा पावसाची शक्यता आहे.

कारंजा घाटगे तालुक्यातील सहा गावांचा संपर्क तुटला

कारंजा घाटगे तालुक्यातील सहा गावांचा संपर्क तुटला

वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे तालुक्यातील माणिकवाडा मार्गांवरील खडक नदीला पूर आलाय. रात्रीपासून संततधार सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाल्याना पूर आला आहे. खडक नदीला पूर आल्याने नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मार्ग बंद झाल्याने सहा गावांचा संपर्क तुटला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने सवारडोह, खापरी, बेलगाव, सुसुद्रा, माणिकवाडा आणी तारासावंगा या गावांचा संपर्क तुटला आहे. पुलावरून पाणी असल्याने कारंजा कडून दुर्गवाडा जाणारी बससुद्धा अडकून पडली होती. मात्र काही वेळेतच पूर वाढत असल्याचे लक्षात येताच चालकाने ती बस पुन्हा कारंजा बस स्थानाकात परत नेलीय. संपर्क तुटलेल्या गावातील विद्यार्थीसुद्धा आज शाळेत पोहचू शकले नाही.