Wardha Flood : हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात पावसाचा कहर, 39 बकऱ्या वाहून गेल्या, पूल वाहून गेल्याने 4 गावांचा संपर्क तुटला

| Updated on: Jul 13, 2022 | 8:36 PM

वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक समुद्रपूर तालुक्याला पावसाने झोडपून काढलं आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.

Wardha Flood : हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात पावसाचा कहर, 39 बकऱ्या वाहून गेल्या, पूल वाहून गेल्याने 4 गावांचा संपर्क तुटला
हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात पावसाचा कहर
Follow us on

वर्धा : मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यात चांगलाच कहर माजावलाय. समुद्रपूर शहरात सतत सुरु असलेल्या पावसामुळे लेंडी नाल्याला पूर आलाय. या पुराचे पाणी दीपाली मंगल कार्यालयामागील वस्तीमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची धावपळ झालीय. पाण्याची पातळी वाढत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने (Administration) नागरिकांना तेथून स्थानांतरित करीत सुरक्षित ठिकाणी हलविले. तालुक्यातील हळदगाव (Haldgaon) येथे नाल्याला आलेल्या पुरात गावातील 39 बकऱ्या वाहून गेल्या होत्या. त्यापैकी 20 बकऱ्यांना वाचविण्यात यश आले. 19 बकऱ्या बेपत्ता आहे. सोबतच हळदगाव येथील पूल वाहून गेल्याने चार गावांचा संपर्क सुद्धा तुटला आहे. तर पावसाच्या संतातधारमुळे हिंगणघाट तालुक्यातही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हिंगणघाट शहराच्या पिली मजीद, भोईवाडा (Bhoiwada) या परिसरात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना स्थानानंतरित करण्यात आले आहे. तर तालुक्यातील टेंबा, सोनेगाव आणी नगाजी पारडी या गावात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वणा नदी सध्या दुभडी भरून वाहत असल्याने हिंगणघाटच्या नदी पुलावरून सेल्फी काढण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. गर्दी वाढल्याचे लक्षात येताच प्रशासनाने तेथे पोलीस बंदोबस्त लावत गर्दी कमी केलीय.

50 च्या वर घरांमध्ये पुराचे पाणी

वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक समुद्रपूर तालुक्याला पावसाने झोडपून काढलं आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे परिसरातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. नागरिकांना तहसीलदार यांनी परिसरातील गजानन महाराज आणी दुर्गा माता मंदिरात राहण्याची व्यवस्था केली आहे. सतत सुरु असलेला पाऊस हा आता नागरिकांसाठी मनस्ताप देणारा ठरत आहे. तालुक्यातील हळदगाव येथे सुद्धा रात्री नाल्याला पूर आल्याने गावात पाणी शिरले. यात गावातील अनेक घरामधील साहित्याची नासधूस झाली आहे. तालुक्यातील मांडगाव येथील सुद्धा इंदिरा वार्ड, कुंभार पुरा आणी पेठ वस्तीतील 50 च्या वर घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. हळदगाव येथीलच हळदगाव, शिवणी, मजरा, सेवा या चार गावांना जोडणारा पूल वाहून गेलाय. पूल वाहून गेल्याने या गावांचा संपर्क रात्रीपासून तुटला आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे वणा नदीच्या पाणी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सोबतच तालुक्यातील तांभारी या गावात सुद्धा पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले असल्याची माहिती आहे. या गावातील सुद्धा शेतकऱ्यांची शेती अक्षरशः खरडून निघाली आहे.

हिंगणघाटातील 30 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले

संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक समुद्रपूर तालुक्यात मागील चोवीस तासात पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात मागील चोवीस तासात समुद्रपूर मंडळात 253.8 मिमी, जाम मंडळात 110 मिमी, गिरड मंडळात 45.5 मिमी, नंदोरी मंडळात 74.8 मिमी, कोरा मंडळात 68.5 मिमी, वायगाव मंडळात 253.8 मिमी, कांढली मंडळात 168 मिमी तर मांडगाव मंडळात 210.5 मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत समुद्रपूर तालुक्यात 489.2 मिमी पाऊस झाला आहे. रात्रीच्या मुसळधार पावसामुळे हिंगणघाट शहराच्या पिली मजीद आणी भोईवाडा परिसरातील तीस कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थानांतरित करण्यात आले होते. तालुक्याच्या सोनेगाव येथेही पाण्याने हाहाकार माजावला आहे. आजनसरा सिरसगाव रस्त्याच्या नाल्याला आलेल्या पुरमुपे सोनेगाव येथील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गावात पाणी शिरत असल्याचे दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोबतच नगाजी पारडी येथेही गावाला पुराच्या पाण्याने वेढले आहे. तालुक्यातीलच टेंबा या गावातही पुराच्या पाण्याने शिरकाव केल्याने चांगलेच नुकसान झाले आहे. हिंगणघाट येथील श्मशानभूमी पूर्ण पाण्याखाली गेली आहे. आणखी दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. वणा नदीवरील असलेल्या धरणामधील पाणीसाठ्याचा विसर्ग केला जाणार आहे. नदीपातळीत आणखी वाढ होणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहत नदी शेजारील परिसरात न जाण्याचे आवाहन उपविभागीय महसूल अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा