Wardha Rain : विदर्भासह वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन, हवामान खात्याचा अंदाज काय?

धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास जीवीतास धोका उद्भाऊ शकतो.

Wardha Rain : विदर्भासह वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन, हवामान खात्याचा अंदाज काय?
वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 10:56 PM

वर्धा : हवामान खात्याकडून प्राप्त सुचनेनुसार, 14 जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात 1 जूनपासून 11 जुलैपर्यंत सरासरी 375 मिमी म्हणजे 42.9 टक्के (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्यमानाच्या) पर्जन्यमान झालेले आहे. वर्धा जिल्ह्यातून वाहणा-या वर्धा नदीवरील उर्ध्व वर्धा धरण (Wardha Dam) 11 जुलै रोजी 60.36 टक्के भरलेले आहे. सद्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या सुरक्षेच्यादृष्टीने येत्या 72 तासांत येणाऱ्या येव्यानुसार पुराचे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठावर राहणाऱ्या लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच नदी पात्र ओलांडून नये. निम्न वर्धा धरणाचे सात दरवाजे 30 सेमीने उघडण्यात आले आहेत. त्यामधून 178.73 (घन.मी./से) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वर्धा नदी (Wardha River) काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

काय काळजी घ्याल

समुद्रपुर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाचे सुध्दा 5 दरवाजे 25 सेंमीने उघडण्यात आलेले आहे. जिल्ह्यात सुरु असलेले पर्जन्यमान व विविध प्रकल्पामधून करण्यात येणारा विसर्ग यामुळे पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले. त्यानुसार, स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणा-या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे. आवश्यक असल्यास सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे. नदी अथवा ओढे व नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यास गर्दी करु नये. जुनाट व मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.

येथे साधा संपर्क

धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास जीवीतास धोका उद्भाऊ शकतो. पुरामध्ये अथवा धरण क्षेत्रात धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असल्यास झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन स्थितीमध्ये स्थानिक तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन अथवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथील दुरध्वनी क्र. 07152-243446 वर संपर्क करावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.