वाशिम : वाशिम (Washim) जिल्हात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये बळीराजाला वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येतंय. मागील एक महिन्यापासून अधून मधून अतिवृष्टी सदृश्य पाऊस होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच अतोनात नुकसान (Damage) झालं तर काही ठिकाणी शेत जमीन खरडून गेलीयं. मागील एका महिन्यापासून आतापर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर वाशिम जिल्हातील ना खासदार ना आमदार फिरकले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmer) रोष निर्माण झालायं.
वाशिम जिल्ह्यात मागील 23 दिवस सलग मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे. शेतात पाणी साचून शेताला नदी नाल्यांचे स्वरूप आल्याने आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी साचलं आहे. मात्र शेतकरी आपल्या रोजीरोटीसाठी संपूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. त्याच शेतीच नुकसान झाले असून याकडे राजकारणी मंडळी आमदार व खासदार पूर्ण दुर्लक्ष करत आहेत. आता तरी शेतकऱ्याकडे लक्ष देण्यासाठी आणि शेतीचे झालेले नुकसान भरपाई करण्यासाठी शासन काही करणार का ?असा प्रश्न उपस्थित केला जातोयं.
जिल्ह्यात पाहायला गेलं तर 70 टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झाले. मात्र शेतीच्या समस्यांचे मूळ शोधण्यात आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्यासाठी एकही आमदार किंवा खासदार दिसत नाहीयं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी आजवर एकाने ही पुढाकार घेतला नाही. साऱ्याच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांसाठी फक्त तात्पुरत्या स्वरूपात मदतीच्या घोषणा केल्या आणि शेतकऱ्यांना झुलवत ठेवले.