मुंबईत पाणी संकट… टँकर सेवा बंद होण्याची शक्यता, नागरिकांना पाणीटंचाईचा फटका
मुंबईत पाणीटंचाईचं सावट! टँकर व्यावसायिकांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळली असून, त्यांच्या संपामुळे मुंबईतील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत.

मुंबईत पाण्याचं संकट गडद असताना पाणीटंचाईचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमांच्या अंमलबजावणीमुळे टँकर व्यवसाय संकटात सापडला आहे.. त्यावरून टँकर व्यावसायिकांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळली असून त्यांच्या संपामुळे मुंबईतील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारच्या नवीन नियमाच्या निषेधार्थ मुंबईतील वॉटर टँकरचालक आणि मालकांची संप पुकारला आहे. संपाचा इमारत आणि इतर बांधकाम प्रकल्पांसह झोपडपट्ट्या आणि व्यावसायिक आस्थापनांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महापालिकेची रुग्णालये, अत्यावश्यक यंत्रणा तसेच अन्य विविध सेवांवर टँकरचालकांच्या संपाचा परिणाम होऊ शकतो
टँकर असोसिएशनच्या मूळ मागण्या
1. मुख्यमंत्री कार्यालयासोबत तातडीची बैठक आयोजित करावी.
2. CGWA (केंद्रीय भूजल प्राधिकरण) नियमांच्या अंमलबजावणीबाबत असोसिएशनची बाजू ऐकून घ्यावी.
3. स्थिती स्पष्ट होईपर्यंत BMC आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू असलेली कारवाई तात्पुरती स्थगित करावी.
4. टँकर चालक, विहीर मालक आणि पाणीपुरवठादारांवर जारी करण्यात आलेल्या नोटिसांबाबत पुनर्विचार करावा.
5. CGWA च्या काही नियमांमध्ये आणि प्रक्रियात्मक अटींमध्ये व्यवहार्य बदल करावेत, कारण त्या प्रत्यक्षात पूर्ण करणे कठीण असल्याचा त्यांचा दावा आहे.
6. विहीर मालकांच्या वीज जोडण्या तोडण्याची कारवाई थांबवावी.
7. खासगी पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा.
8. मागण्यांवर निर्णय होईपर्यंत टँकर व्यवसायावर होणारी प्रशासकीय कारवाई रोखावी.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांतील पाणीसाठा केवळ 40 दिवस पुरेल इतकाच शिल्लक आहे. अशात मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनने रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून टँकर सेवा बंद ठेवण्याची घोषणा केलीये. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील नागरिकांना पाणीटंचाईचा फटका बसण्यास सुरुवात झालीये.
टँकर सेवा बंद झाल्याने मुंबईतील पाणी संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नव्या नियमांविरोधात टँकर चालक संघटना आक्रमक झाल्या आहेत. जमिनीतील पाणी उपसा आणि परवानग्यांबाबतच्या नियमांमुळे अडचणी निर्माण झाल्याचा संघटनेने दावा केलाय. संघटनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका प्रशासनाकडे निवेदन देण्यात आलंय. मागण्यांवर सकारात्मक निर्णय होईपर्यंत एकही खाजगी टँकर रस्त्यावर उतरवणार नसल्याचा त्यांनी इशारा दिलाय…
मुंबईतील हजारो गृहनिर्माण सोसायट्या टँकर पाण्यावर अवलंबून आहेत. अनेक हॉटेल्स, व्यावसायिक संकुले आणि उद्योगांनाही याचा फटका बसण्याची शक्यता. पालिकेच्या 10 टक्के कपातीनंतर टँकर बंद झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक, सोसायट्या आणि व्यावसायिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. आता सरकार, पालिका प्रशासन आणि टँकर संघटना यांच्यात नेमकी काय चर्चा होणार याकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष लागलं आहे.
