
भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा भारतामधील अनेक लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. मात्र भारतामधील शेती ही प्रमुख्यानं पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टी होते, त्याचा पिकांना फटका बसतो, तर कधी-कधी पाऊसच पडत नाही, त्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रामध्ये अडकतात. पावसाच्या असमान प्रमाणामुळे सध्या भारतामधील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गेल्यावर्षी देशासह राज्यात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला होता. अनेक राज्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. यामधून महाराष्ट्र देखील सुटला नाही. अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. दरम्यान यंदा देशात पावसाचं प्रमाण कसं असणार? याबाबतचा पहिला अंदाज समोर आला आहे, मात्र यामुळे आता चिंतेत भर पडली आहे. जागतिक हवामान संघटनेकडून यावर्षीचा मान्सूनबाबतचा पहिला अंदाज जाहीर करण्यात आला आहे.
जागतिक हवामान संघटना (WMO) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी भारतामध्ये मान्सूनवर अल नीनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. भारतामधील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे या भाकीतामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते. महाराष्ट्रातही यावेळी अल नीनोचा प्रभाव पहायला मिळू शकतो, त्यामुळे राज्यातही पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर यावर्षी मात्र उन्हाचा कडाका चांगलाच जाणवणार आहे. यावर्षी तापमानात मोठी वाढ पहायला मिळू शकते असा इशाराही जागतिक हवामान संघटनेकडून देण्यात आला आहे.
मात्र यामध्ये दिलासादायक गोष्ट म्हणजे काही हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या तरी अल नीनोच्या प्रभाबाबत कोणताही अंदाज वर्तवणं हे घाईचं ठरू शकतं. मात्र देशात पावसाची परिस्थिती काय असणार? अल नीनोचा देशातील पावसाला कितपत फटका बसणार? याच चित्र मे नंतरच स्पष्ट होऊ शकतं. त्यामुळे सध्या चिंता करण्याचं कारण नाही, मात्र या वर्षी पावसावर अल नीनोचं सावट आहे.