धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं श्रेय कोणाला? शरद पवारांनी थेट नाव घेतलं, पहिली प्रतिक्रिया
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपर लीक प्रकरणानंतर देशभरात चांगलंच वातावरण तापलं होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टींच आंदोलन सुरू होतं. त्यानंतर वीस जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला. या मोर्चात आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे हे आंदोलन अधिकच पेटलं. विरोधी पक्षांचा देखील या आंदोलनाला पाठिंबा मिळाला, अखेर त्यानंतर शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
सरकारला राजीनामा देण्यासाठी भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या साक्षीचं प्रतिक आहे. युवा शक्तीच्या एकजुटीचा विजय आहे. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांचं मी आभार मानतो. देशातील लोकशाहीने कात टाकलं आहे. त्याचं श्रेय युवाशक्तीला जाते. हे नमूद करावं वाटतं, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, पेपरफुटीने अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो. आनंद हा आहे की संयमाने आणि शांततेने युवा पिढीने आपल्या भावना देशाच्या नेतृत्वासमोर मांडल्या. त्यांना यश आलं. चर्चेच्या दोन तीन फेऱ्या झाल्या होत्या. मी स्वत: पंतप्रधानांना भेटलो होतो. त्यांना विनंती केली, लोकशाहीत संवाद ठेवण्याची आवश्यकता असते. संवाद न ठेवल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्ही चर्चा सुरू ठेवली पाहिजे, एक तर राजीनामा घ्या किंवा संवाद सुरू करून त्यांचं ऐका. तुम्ही तुमच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एक दोन ज्येष्ठ मंत्र्यांना आंदोलकांशी चर्चा करण्यास सांगा. मी अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील सांगितल होतं की, सरकार संवाद साधायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका, सुदैवाने त्यांची बोलण्याची तयारी दाखवली असं यावर शरद पवार यांनी म्हटलं आहे.