
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले. या निधनानंतर आता सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या त्या विधीमंडळ गटनेत्या आहेत. त्यातच आता पक्षाचे नेतृत्व कोणाच्या हाती जाणार, याची चर्चा महाराष्ट्रात रंगताना दिसत आहेत. या कठीण काळात पक्षाला सावरण्यासाठी आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव सातत्याने पुढे येत आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची पुढील रणनीती आणि नेतृत्वाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
सुनील तटकरे यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्षपद दिले जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली मजबूत करण्याच्या हेतूने आम्ही सर्वजण सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. अजितदादांनी जेव्हा निर्णय घेतले, तेव्हा ते केवळ त्यांचे वैयक्तिक निर्णय नव्हते, तर ते सर्वांनी मिळून घेतलेले सामूहिक निर्णय होते. आताही पक्ष त्याच परंपरेने पुढे जाईल, असे सुनील तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा रंगली होती. मात्र सुनील तटकरे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः स्पष्ट केले आहे की, ते या अध्यक्षपदाच्य स्पर्धेत नाहीत. आता यावर तटकरेंनीही भाष्य केले. आमच्यासाठी विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदाची जागा लवकरात लवकर भरणे जास्त महत्त्वाचे होते. आता कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन योग्य वेळी पुढील निर्णय घेतले जातील,” असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
अजित पवारांच्या राजकीय प्रवासावर आणि त्यांच्या निर्णयांवर सुनील तटकरे यांनी भाष्य केले. अनेकांकडून दादांची अंतिम इच्छा काय होती यावर दावे केले जात आहेत. मात्र, वास्तव हे आहे की दादांची इच्छा २०१९ मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याची होती. दादांची ही भूमिका त्यावेळी स्वीकारली गेली नाही, म्हणूनच त्यांना पक्षासंदर्भात कठोर निर्णय घ्यावे लागले. लोकसभेच्या निवडणुका दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात लढल्या. राष्ट्रवादीच्या ४१ आमदारांची विधानसभेला कोणासोबत लढत झाली याची आकडेवारी स्पष्ट आहे. १२ कोटी जनतेने एनडीएसोबत जाण्याच्या निर्णयाला अभूतपूर्व कौल दिला आहे, असे सुनील तटकरे म्हणाले.
दरम्यान अजित पवारांनी आपल्या मेहनतीने पक्षाला ज्या उंचीवर नेऊन ठेवले, ती परंपरा पुढे नेण्याचे आव्हान आता सुनेत्रा पवार आणि उर्वरित नेतृत्वासमोर आहे. विधीमंडळ पक्षनेते म्हणून सुनेत्रा वहिनींची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, आगामी काळात आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच पक्षाचे संघटन मजबूत केले जाईल, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.