Khavadya Dongar : कुणाल चांदगुडेच्या कुटुंबाने गाव का सोडलं? प्रकरणात नवा ट्विस्ट, धक्कादायक माहिती समोर
छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी एक दुर्दैवी घटना घडली, चांदगुडे कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला. दरम्यान चांदगुडे प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत, आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे, चांदगुडे कुटुंबातील तीन व्यक्तींचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला. मृतांमध्ये मुलगा कुणाल चांदगुडे, आई सांगितला चांदगुडे आणि वडील मुरलीधर चांदगुडे यांचा समावेश आहे. सुरुवातीला कुणाल याने आयफोनसाठी हे पाउल उचलल्याचं बोललं जात होतं. मात्र आता या प्रकरणात दररोज नवनीन खुलासे होत आहेत. चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूनंतर कुणालचे वडील मुरलीधर चांदगुडे यांच्या कुटुंबाकडून कुणालची आई संगीता चांदगुडे यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत. संगिता चांदगुडे यांच्यामुळेच आमचा मुलगा आमच्यापासून दूर गेला असा आरोप मुरलीधर चांदगुडे यांच्या कुटुंबाकडून करण्यात येत आहे.
तर दुसरीकडे मात्र संगीता चांदगुडे यांच्या माहेरच्या लोकांकडून या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुलरीधर चांदगुडे यांच्याच कुटुंबावर आरोप होत आहेत. आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुणालची मावशी पल्लवी जऱ्हाड यांनी या प्रकरणावर बोलताना मोठा खुलासा केला आहे. ही घटना का घडली? कशी घडली? त्या मागची कारणं काय होती? हे सगळं समोर येईलच परंतु आम्हाला दु:खातून सावरण्यासाठी थोडा वेळ द्या असं कुणालच्या मावशीने म्हटलं आहे.
तसेच कुणालच्या वडिलांनी वीस वर्षांपूर्वी गाव सोडलं होतं, त्यांनी गाव का सोडलं हे सांगताना कुणालच्या मावशीने धक्कादायक खुलासा केला आहे. मुलाची एवढीच जर काळजी होती तर वीस वर्षांपूर्वी मुलाने गाव आणि शेत सोडावं, यासाठी मग त्याच्या डोक्यात फावडलं का घातलं होतं? असा सवालही पल्लवी जऱ्हाड यांनी केला आहे. दरम्यान आतापर्यंत विविध माध्यमांमधून जी माहिती समोर येत आहे. त्यावरून तरी या घटनेमागे कौटुंबीक वादाचीच पार्श्वभूमी असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कुणाल हा मानसिक दबावामध्ये होता, तो डिप्रेशनमध्ये होता अशी माहिती देखील समोर येत आहे. कुणालची आई संगिता यांचे देखील अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, त्यामधून देखील या कुटुंबामध्ये अंतर्गत वाद होता, असा अंदाज लावला जात आहे.