EXPLAINER : बिनविरोध होता होता, अचानक सोलापूरची विधान परिषद निवडणूक का लागली?
राज्यातील विधान परिषदेच्या १७ निवडणूकांपैकी ६ निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत. सोलापूरचीही निवडणूक देखील बिनविरोध होणार होती, मात्र पडद्यामागे घडामोडी घडल्याने आता ही निवडणूक १८ जूनला होणार आहे.

राज्यात होऊ घातलेल्या १७ विधान परिषदेच्या निवडणूकांपैकी ६ निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. उरलेल्या ११ विधान परिषदेच्या निवडणूकांसाठी १८ जून रोजी मतदान तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात सहा जागी बिनविरोध निवडणूका झाल्याने आणि महायुतीचा मोठा विजय झाला आहे. आता उरलेल्या ११ जागी देखील महायुतीचे उमेदवार निवडून येतील असे भाजपाचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. मात्र, राज्यात सोलापूरची निवडणूक बिनविरोध होणार होती. त्यात अचानक कसा बदल झाला ? या मागच्या घडामोडी देखील रंजक आहेत.
प्रतिष्ठेचा इश्यू केल्यामुळे…
काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर सोलापूरची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेचा इश्यू केल्यामुळे ही निवडणूक लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपच्या राज्यातील भाजपच्या बड्या नेत्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मोहिते पाटील यांना कॉल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांना बिनविरोधसाठी कॉल किंवा निरोप दिला नसल्याने ही निवडणूक लागल्याची चर्चा देखील रंगली आहे.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांचे व्याही आणि भाजपाचे खासदार उज्जल निकम यांच्या मार्फत देखील मध्यस्ती करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून कोणत्याही प्रकारचा थेट संवाद झाला नसल्याने ही निवडणूक लागल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपकडे मोठे संख्याबळ असले तरी ही निवडणूक भाजपसाठी निश्चितच सोपी नसल्याचे म्हटले जात आहे.
1998 साली भाजपकडे अत्यल्प मते असताना भाजपाने तत्कालीन काँग्रेसला धूळ चारली होती. 1998 सालच्या विधान परिषदेत भाजपकडे 70 तर काँग्रेसकडे 302 मते होती.असे असताना भाजपच्या सुभाष देशमुख यांनी काँग्रेसच्या युन्नूस शेख यांचा 36 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे भाजपातील अंतर्गत धुसफूस, निधी मिळत नसल्याने नाराज शिवसेना शिंदे गट ही भाजपची दुखरी बाजू आहे.त्यामुळे वरकरणी संख्याबळ असलेल्या भाजपाला ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी राहिलेली नाही.
उत्तम जानकर नाराज, आघाडीत बिघाडी
सोलापूर विधान परिषदेत महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांच्या उमेदवारीवरून सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत पडली फुट पडल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मोहिते पाटील यांनी वसंत नाना देशमुख यांचे नाव जाहीर करून आमचा केसाने गळा कापल्याचा आरोप उत्तम जानकर यांनी केली आहे. ज्याला जिल्हा परिषदेचा उमेदवार निवडून आणता येत नाही अशा व्यक्तीला मोहिते पाटील यांनी उमेदवारी दिली असल्याचाही टोला आमदार उत्तम जानकर यांनी लगावला आहे.
सगळेच मातब्बर कमजोर उमेदवारावर नाराज
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर,आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे, नारायण आबा पाटील सगळेच मातब्बर नेते या उमेदवारीवर नाराज असल्याचेही उत्तम जानकर यांनी म्हटले आहे. वसंत नाना देशमुख यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देऊन भाजपाला ही निवडणूक बिनविरोध केल्या सारखाच निर्णय मोहिते पाटील यांनी घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. वसंत नाना देशमुख हा उमेदवार सक्षम नसतानाही मोहिते पाटील यांनी का दिला ? असा सवाल हे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे. या निवडणुकीत आम्ही वसंत नाना देशमुख यांच्याबरोबर नसल्याचे आमदार उत्तम जानकर यांनी स्पष्ट केले आहे.