काळ्या बाहुल्या, पंचधातूंच्या बांगड्या आणि महिलांचे फोटो… यवतमाळमधील त्या थरारक रात्री काय घडलं?

यवतमाळमध्ये गुप्तधनाच्या शोधात अघोरी विधी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. घटनास्थळी महिलांचे फोटो आणि केस सापडल्याने खळबळ उडाली असून सहा आरोपींविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

काळ्या बाहुल्या, पंचधातूंच्या बांगड्या आणि महिलांचे फोटो... यवतमाळमधील त्या थरारक रात्री काय घडलं?
Aghori Rituals
| Updated on: Apr 28, 2026 | 1:00 PM

एकीकडे देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला मात्र अद्यापही अंधश्रद्धेचा काळोख कायम असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. यवतमाळच्या कारेगाव शिवारात गुप्तधनाच्या हव्यासापोटी अघोरी विधी करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी मध्यरात्री रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी मुख्य मांत्रिकासह सहा जणांना अटक केली आहे. यावेळी घटनास्थळावर महिलांचे फोटो आणि केस सापडल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास दांडे आणि त्यांचे पथक शनिवारी रात्री परिसरात गस्त घालत होते. अलीकडेच शेतातील मोटार पंप चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी आल्याने पोलीस सतर्क होते. रात्री उशिरा वरुड-कारेगाव रस्त्यावर एक संशयास्पद वाहन उभे दिसल्याने पोलिसांनी तपासणी सुरू केली. यावेळी वाहनातील साहित्यावरून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी जवळच असलेल्या शेतात धाड टाकली. जिथे अघोरी विधी सुरू होत्या.

अघोरी पूजेशी संबंधित संशयास्पद वस्तू जप्त

यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून अघोरी पूजेशी संबंधित संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. यात प्रामुख्याने काळी बाहुली, त्रिशूळ, रुद्राक्ष माळ, लिंबू, सुया, तावीज आणि पंचधातूची बांगडी या वस्तू सापडल्या. यावेळी अनेक महिलांचे फोटो आणि मानवी केसांचे गुच्छ पोलिसांना सापडले आहेत. हे फोटो तेथे का होते आणि त्या महिला सुरक्षित आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. त्यासोबतच जमीन खोदण्यासाठी लागणारे फावडे, ज्वारीचे पीठ आणि विविध रंगांचे धागेही तिथे सापडले आहेत.

पाच जणांना अटक

या प्रकरणी पोलिसांनी वीरेंद्र रमेश गायकवाड (मुख्य पुजारी) याच्यासह अशोक रामधन राठोड, रितेश रवी भगत, लिलेश्वर विश्वनाथ बावणे, कुंदन दरासिंग राठोड आणि केशव राठोड यांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी वाशिम जिल्ह्याचे रहिवासी आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार, सर्व आरोपींवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय, दुष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा, २०१३ च्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Follow Us