राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याची गरज होती का?, उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल

| Updated on: Jul 09, 2023 | 6:21 PM

हप्ते घेणाऱ्याला मी मंत्री केलं नव्हतं. आपलं काही अजून भाजप झालं नाही, असा खरपूस समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याची गरज होती का?, उद्धव ठाकरे यांचा भाजपला सवाल
Follow us on

यवतमाळ : उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी पोहरादेवी येथे भेट दिली. त्यानंतर संजय राठोड यांच्या मतदारसंघात दिग्रस येथे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले, आंधळ्या निवडणूक आयोगाचे डोळे उघडले असतील. नसतील उघडले तर त्यांना मिटलेले ठेवावे कारण या ठिकाणी असलेल्यांचे डोळे उघडले आहेत.समोर बसलेले लोकं हे जगदंबेचे रूप आहे. शंकराचे तिसरे नेत्र आहे.

महाराष्ट्रासाठी मागितले मागणे

जगदंबेला आशीर्वाद मागितला पाहिजे. मी पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे, असा आशीर्वाद मागितला नाही. या राज्यात गद्दार आणि लाचारांचं सरकार चाललं आहे. राजकारण खालच्या पातळीवर जात आहे. महाराष्ट्र हा राकट, कणखर होऊ दे, असे मागणे मागितले असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

जगदंबेला साकडं घातलं की, पाऊसपाणी व्यवस्थित येऊ दे. अशी प्रार्थना जगदंबेला केली. हप्ते घेणाऱ्याला मी मंत्री केलं नव्हतं. आपलं काही अजून भाजप झालं नाही, असा खरपूस समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला.

ही लाचारी नाही का?

भारतीय जनता पक्ष हा बाजार बुडव्यांचा पक्ष झाला आहे. आधी भाजपमध्ये चांगली लोकं होती. पण, आता भ्रष्टाचाराने माखलेले लोकं भाजपमध्ये आले आहेत. दुसऱ्या पक्षातले तुमच्याकडे येतात. तुम्ही सतरंज्या हातरण्याचं काम करता. ही लाचारी नाही का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

छगन भुजबळ शिवसेनेत होते. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. इथपर्यंत ठिक आहे. पण, आता पक्ष संपवण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवली जाते. आम्ही तुमच्यावर बोलतो. तुम्ही आमच्यावर बोला. शेवटी जे ठरवायचं ते जनता जनार्दन ठरवत असते. याला लोकशाही म्हणतात.

मत कुणालाही द्या, सरकार माझंच येणार. आधी मतपेटीतून सरकार जन्माला येत होतं. आता खोक्यातून सरकार जन्माला येत आहे. आधी आमचे आमदार फोडले. अपक्षही नेले. पुन्हा राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याची गरज होती का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.