अवकाळीत 50 हजार हेक्टरवरचा गहू आडवाच ; शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज मातीत…

| Updated on: Apr 08, 2023 | 3:38 PM

मागील अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याआधीच आता पुन्हा अवकाळी पावसाचे संकट ओढावल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.

अवकाळीत 50 हजार हेक्टरवरचा गहू आडवाच ; शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज मातीत...
शेती नुकसानीचा फोटो संग्रहित आहे.
Follow us on

यवतमाळ : काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाने यवतमाळ जिल्ह्यात हजेरी लावलेली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याआधीच आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाल्याने यवतमाळमधील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मागील वेळी झालेल्या अवकाळी पावसात रब्बी हंगामावर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे आताही राहिलेल्या पिकावर अवकाळी पावसामुळे मोठे संकट आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांच मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे गहू आडवे झाले आहेत.

साधारण जिल्ह्यात 50 हजार हेक्टर नुकसानीच अंदाज वर्तविला जात आहे. खरीप हंगामा पासून रब्बी हंगामापर्यंत या गारपिटीने शेतकऱ्यांचा पिच्छा सोडला नाही. या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, नेर, आर्णी या तीन तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

मागील अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याआधीच आता पुन्हा अवकाळी पावसाचे संकट ओढावल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने आता शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांवर ओढावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे आता तरी शासनाने पुन्हा एकदा पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.