
राज्यात सध्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार असून 7 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. 21 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. आता 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार अर्ज माघार घेत असल्याचे समोर आले आहे. यामुळे आतापर्यंत भाजपचे 8 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, कणकवली पंचायत समिती आणि देवगड पंचायत समितीतील हे उमेदवार आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या रणनीतीमुळे हे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत आतापर्यंत खारेपाटण गटातील उमेदवार प्राची इस्वालकर(भाजप), बांदा गटातील उमेदवार प्रमोद कामत (भाजप), पडेल गटातील उमेदवार सुयोगी रविंद्र घाडी (भाजप) बापर्डे गटातील उमेदवार अवनी अमोल तेली (भाजप) जाणवली गटातील उमेदवार रुहिता राजेश तांबे (शिवसेना) हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या सर्वांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना माघार घेतल्यामुळे भाजपला मोठा फायदा झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपचे काही सदस्य बिनविरोध झाले आहेत. वरवडे पंचायत समितीत भाजपचे सोनू सावंत बिनविरोध निवडून आले आहेत. वरवडे पंचायत समितीमध्ये सुरुवातीला तीन उमेदवार रिंगणात होते. मात्र ठाकरे गटाचे सुधीर सावंत आणि मनसेचे शांताराम साधे यांनी माघार घेतल्यामुळे एकमेव उमेदवार म्हणून सोनू सावंत यांचा अर्ज शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ते बिनविरोध झाले आहेत.
देवगड तालुक्यातील पडेल पंचायत समितीत भाजपचे अंकुश यशवंत ठूकरूल, नाडण पंचायत समितीत भाजपचे गणेश सदाशिव राणे हे बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच बापर्डे पंचायत समितीत भाजपच्या संजना संजय लाड याही बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामुळे अलिकडेच पार पडलेल्या महानगर पालिकेप्रमाणे यावेळीही भाजपने बिनविरोध पॅटर्न राबविल्याचे दिसत आहे. 27 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख असल्यामुळे अजूनही काही उमेदवार बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.